देशातील काही भागात झालेल्या जातीय हिंसाचाराबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली.
हैदराबाद- देशातील काही भागात झालेल्या जातीय हिंसाचाराबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. जातीय तणाव प्राथमिक स्वरुपात असतानाच त्याचे निरसन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे कौशल्य अधिक बळकट करण्यावर राष्ट्रपतींनी जोर दिला. येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीच्या पोलिस संचलनादरम्यान ते बोलत होते.
आपल्या देशात विविध धर्मामध्ये तेढ निर्माण होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. देशासमोर अंतर्गत सुरक्षेसह देशाबाहेरील दहशतवाद्यांकडून सुरक्षेचे आव्हान आहे. माओवाद्यांच्या समस्येवर सर्वसमावेशकउपाय काढण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. विविध आव्हानांना तोंड देत असताना पोलिसांकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होऊ देता कामा नये, असेही त्यांनी सांगितले.