ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या पाटबंधारे विभाग पंचायत समिती वाडाने तालुक्यातील विविध कोकण टाइप बंधा-याचे पाणी अडवण्यासाठी टाकलेल्या गेटच्या (दरवाजा) कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे.
वाडा – ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या पाटबंधारे विभाग पंचायत समिती वाडाने तालुक्यातील विविध कोकण टाइप बंधा-याचे पाणी अडवण्यासाठी टाकलेल्या गेटच्या (दरवाजा) कामात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या भोंगळ कारभाराचा फटका बसून बंधा-यातील पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती होत असल्याने डिसेंबरअखेपर्यंत पाण्याची चणचण निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या पाण्याच्या भरवशावर भाजीपाल्याची लागवड केलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
वाडा तालुक्यात मागील दहा वर्षात जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाने काही कोटी रुपये खर्चून मेट, कोंडला, आलमान, पीक, गुहीर व सांगे येथे कोकण टाइपचे बंधारे बांधले आहेत. या सर्व बंधाऱ्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. या सर्वच बंधा-यांत फेब्रुवारी अखेपर्यंतही पाण्याचा साठा शिल्लक राहत नाही. या बंधा-यांच्या दुरुस्तीसाठीही दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. पावसाळय़ानंतर ऑक्टोबरमध्ये या बंधा-याचे दरवाजे बंद करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून ‘गेट’ खरेदी केले जातात. निकृष्ट दर्जाचे दरवाजे व ते बसवण्याचे कामही बेपर्वाईने होत असल्याने पाणी गळती होऊन हे बंधारे फेब्रुवारी अखेरीसच कोरडे पडतात. यंदा या बंधा-यांचे पाणी अडवण्यासाठी काही ठिकाणी फायबरचे गेट वापरण्यात आले. या फायबर गेटचा दर्जा सुमार असल्याने ते पाण्याच्या दाबाने तुटून गेले आहेत. तर काही ठिकाणी गेट बसवण्यासाठी कोणत्याही प्रकारची पॅकिंग न करता मातीचा वापर केल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी गळती होऊ लागली आहे.
वाडा तालुक्यातील आलमान, पीक, कोंडला, मेट येथील बंधा-यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी गळती होत असल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच हे बंधारे कोरडे पडू लागले आहेत. आलमान बंधा-याच्या पाण्यावर विसंबून स्थानिक शेतक-यांनी भाजीपाला, फुलशेतीचा मळा फुलवण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. मात्र पाणी अडवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे फायबर गेट बसवल्याने व ते तुटून गेल्याने बंधारा कोरडा पडू लागला आहे. आलमान बंधा-याचे पाणी वेळीच अडवले नाही, तर शेतक-यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होईल, असे आलमान येथील शेतकरी रमेश ठाकरे यांनी सांगितले.