अतिवृष्टीमुळे तालुक्यातील भातशेती वाहून गेल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे.
कुडूस – अतिवृष्टीमुळे तालुक्यातील भातशेती वाहून गेल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे वाडय़ात येत्या १० दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करून, नुकसानग्रस्त शेतक-यांना भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कुणबी सेनेने निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे.
तालुक्यात जूनपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे वाड्यातील शेतक-यांच्या पेरण्या कुजून गेल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उपजीविकेचे साधनच नष्ट झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पावसामुळे शेतक-यांनी पेरलेले बियाणे दोन ते तीन वेळा वाहून गेले आहे. काही बियाणे वेळत न उगवल्याने शेतजमीन लागवडीअभावी ओस पडली आहे. शिवाय सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने केलेली लागवड कुजून गेली आहे. दुबार पेरणीसाठी सरकारने बी-बियाणेही उपलब्ध करून दिलेले नाही. तसेच अतिपावसामुळे बांधबंदिस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार स्तरावर नुकसानीचे पंचनामे करून एकरी २५ हजार रुपये भरपाई द्यावी व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी कुणबी सेनेचे सरचिटणीस संदेश सावंत यांनी केली आहे.