महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ढासळलेली नसून ती देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मजबूत अर्थव्यवस्था आहे. महाराष्ट्राचा शेतकरी आज अडचणीत आहे.
मुंबई – महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ढासळलेली नसून ती देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मजबूत अर्थव्यवस्था आहे. महाराष्ट्राचा शेतकरी आज अडचणीत आहे. वाटल्यास अधिक कर्ज काढा, पण महाराष्ट्राचा शेतकरी जगवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत सरकारला उद्देशून केले.
शेती व्यवसायावरील संकट, दुष्काळी स्थिती, शेतक-यांच्या आत्महत्या, यावर शेतक-यांची तातडीने कर्जमाफी होण्याची गरज या विषयांवर विरोधी पक्षांनी नियम २९३नुसार आणलेल्या चच्रेत सहभागी होताना चव्हाण बोलत होते.
महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज असल्याचा खूप गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात आपली पत आहे, म्हणून आपणास कर्ज मिळते. आपल्या उत्पन्नाच्या मर्यादेत आपण काढलेले कर्ज १७.८ टक्के इतकेच आहे. आपण २४.८ टक्के इतके कर्ज काढू शकतो. उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांपेक्षा आपली अर्थव्यवस्था भक्कम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात सध्या देशाचे कर्ज ६८ टक्के, जपान २२७ टक्के, इटली १३७ टक्के, ग्रीस १७५ टक्केइतके आहे. त्या तुलनेत आपले राज्य भक्कम पायावर उभे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
चव्हाण पुढे म्हणाले, साखर उद्योगही अडचणीत आहे. केंद्र सरकारचे पॅकेज फसवे आहे. पॅकेजचे रूपांतर अनुदानात केले तरच शेतकरी वाचेल. जलयुक्त शिवार योजना चांगली आहे. परंतु ती काँग्रेस सरकारने १५ तालुक्यात सुरू केलेली योजना आहे. सरकारने ती चांगल्या प्रकारे पुढे न्यावी.