वसई रोड ते कल्याण जंक्शनदरम्यान लोकल गाडी सुरू करण्याची मागणी वसई रोड यात्री संघाने केली आहे. याबाबत संघटनेने रेल्वे मंत्र्यांना निवेदन पाठवले आहे.
वसई -वसई रोड ते कल्याण जंक्शनदरम्यान लोकल गाडी सुरू करण्याची मागणी वसई रोड यात्री संघाने केली आहे. याबाबत संघटनेने रेल्वे मंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. या पत्रात या गाडीची का गरज आहे, याची माहिती देण्यात आली आहे.
कल्याण आणि वसई ही दोन्ही स्थानके मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी महत्त्वाची आहेत. या स्थानकादरम्यान लोकल सेवा सुरू करण्याविषयी केंद्रीय रेल्वे विभागाला वारंवार पत्रव्यवहार केला असूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्याने पाठवलेले निवेदन हे स्मरणपत्र समजण्यात यावे, अशी विनंती संघटनेने निवेदनात केली आहे.
विरार, वसई परिसरातील प्रवाशांना मध्य रेल्वेच्या कल्याण, ठाणे आदी भागांत जायचे असल्यास त्यांना दादरला येऊन लोकल बदलावी लागते. हा प्रवासात नाहक वेळ जातो. हीच स्थिती ठाणे कल्याणहून वसई, विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांची होते. हे अंतर वसई-कल्याण दरम्यान लोकल सुरू झाल्यास दोन तासांनी कमी होऊ शकते, असे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.
वळसा घालून प्रवास केल्यामुळे 52 किमीचे अंतर कापावे लागते. हे अंतर कल्याण-वसई लोकलमुळे कमी होऊ शकते. या दोन्ही स्थानकादरम्यान लांब पल्ल्यांच्या गाडय़ा चालवल्या जात असून, याच मार्गावरून लोकल गाडी सुरू करण्यास अडचण येणार नसल्याचेही संघटनेच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.