वसईतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधांचा प्रश्न कायम असल्यामुळे रुग्णांची हेळसांड सुरूच आहे.
बोईसर- वसईतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असुविधांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड सुरूच आहे. रुग्णालयाची दुरवस्था पाहता या रुग्णालयात आल्यावर रुग्ण बरा होण्यापेक्षा जास्तच आजारी पडण्यासारखी स्थिती आहे. दुसरीकडे हे रुग्णालय जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे हस्तांतर करण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून ‘जैसे थे’ आहे. सध्या या रुग्णालयात दोन डॉक्टर कार्यरत असून त्यांच्यावर कामाचा ताण आहे.
रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या रोषाला येथील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना समोरे जावे लागत आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णालयात सोयीसुविधा पुरवण्यासाठी कोणत्याही ठोस प्रयत्न होत नसल्याचा हा परिणाम आहे. वसई तालुक्यात लोकसंख्या वाढ व नागरिकरण वेगाने होत आहे. मात्र, त्या प्रमाणात पुरेशा वैद्यकीय सुविधा अद्याप या तालुक्यात पुरवण्यात आलेल्या नाहीत.
वसई तालुक्यात विरार येथे एकमेव ग्रामीण रुग्णालय आह़े या ठिकाणी सर्वसामान्य व दारिद्ररेषेखालील कुटुंबातील रुग्णांची नेहमीच गर्दी असते. प्रसूती उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधाही या रुग्णालयात पुरवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रुग्ण दगावण्याची भीती आहे. विरार पूर्वेकडील एक उन्नती गुरव (२०) या बाळंतपणासाठी या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या कारणावरून केंद्रातील तत्कालीन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणामुळे या रुग्णातील ढिसाळ कारभार व सोयीसुविधांच्या कमतरतेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
रुग्णालयात सोनोग्राफी, एक्स रे व अतिदक्षता विभागाशिवाय अन्य कोणताही विभाग कार्यरत नाही. प्राथमिक सुविधांचाही अभाव आहे. वैद्यकीय उपकरणे नादुरुस्त आहेत. प्रसूतीसाठी आवश्यक अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणाही पुरेशी नाही. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांवरील कामाचा ताण वाढत आहे. एकीकडे संबंधित वरिष्ठ विभागाकडून रुग्णालयात सुविधा पुरवण्याबाबत होणारे दुर्लक्ष आणि दुसरीकडे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांडून वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांवर टाकली जाणारी जबाबदारी या दुहेरी दबावाखाली डॉक्टरांना काम करावे लागत आहे.
डॉ. स्वाती परब यांनी दिलेला राजीनामा माझ्यापर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. वैद्यकीय अधीक्षक हे पद भरण्याचा अधिकार सरकारचा आहे. मात्र, डॉ. परब यांनी खरोखरच राजीनामा दिला असेल तर त्यांनी का राजीनामा दिला याची चौकशी केली जाईल. – डॉ. रत्नाकर कुलकर्णी, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक
वैद्यकीय अधीक्षकांचा राजीनामा गैरसोयींना कंटाळून?
रुग्णांसाठी पुरेशा वैद्यकीय सुविधा नसणे, आरोग्य व संबंधित विभागांचे होणारे दुर्लक्ष, लोक प्रतिनिधींनी रुग्णालयाकडे फिरवलेली पाठ, गैरसोयीमुळे पडणारा कामाचा ताण व रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती परब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. विरारच्या ग्रामीण रुग्णालयात सुविधांची कमतरता असल्यामुळे डॉ. परब यांनी राजीनामा दिला का, असे ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्नाकर कुलकर्णी यांना विचारले असता ‘महाराष्ट्रातील बहुसंख्य सरकारी रुग्णालयात १०० टक्के सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे स्थिती संभाळून उपलब्ध असलेल्या यंत्रणेवरच काम करावे लागते. प्रथम श्रेणीचा अधिकारी मिळत नसेल तर जो अधिकारी वरिष्ठ असेल त्यालाच तेथील जबाबदारी सांभाळावी लागते’. असे मत त्यांनी व्यक्त केले.