कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतीमधील दुर्गम भागात असलेल्या वाघिणीवाडीकडे जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नाही.
नेरळ- कर्जत तालुक्यातील शेलू ग्रामपंचायतीमधील दुर्गम भागात असलेल्या वाघिणीवाडीकडे जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता नाही. ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वन विभागाने वन जमिनीतून रस्ता करण्यास विरोध केल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे. दरम्यान, वन विभागाने शंभर घरांची वस्ती असलेल्या वाघिणीवाडीसाठी रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केली आहे.
देश स्वतंत्र होऊन ६६ वर्ष झाली तरी मुंबई, ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्जतमधील वाघिणीवाडीकडे जाण्यासाठी अद्याप पक्का रस्ता बांधलेला नाही.शेलू ग्रामपंचायतीमध्ये असलेली ही वाडी माथेरानजवळील डोंगरावर वसली आहे. कर्जत आणि रायगडचे शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव येथून दोन किलो मीटर अंतरावर वाघिणीवाडी आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना बेडीसगावपासून पायीच जावे लागते. पावसाळ्यात डोंगरावरील पायवाट निसरडे होत असल्याने आदिवासींना कसरत करून डोंगर पार करावा लागतो. बेडीसगाव सोडल्यानंतर एक नाला आहे. मोठा पाऊस झाल्यास नाला भरून वाहू लागतो. त्यामुळे शिक्षण आणि कामानिमित्त कर्जत आणि बेडीसगाव येथे येणारी शाळकरी मुले, ग्रामस्थांना पाणी ओसरून जाईपर्यंत नाल्याच्या काठावर किंवा बेडीसगावामध्येच राहावे लागते.
बेडीसगावपासून वाघिणीवाडीपर्यंत जंगलातून जाणारा रस्ता मोठा खडतर व चढणीचा आहे. वाघिणीवाडीत शाळा, रुग्णालये अन्य सरकारी कार्यालये काहीच नसल्याने छोटया-मोठया कामासाठीही लहान मुले, आजारी रुग्ण व वृद्धांनाही दीड किलोमीटरचा चढणीचा रस्ता चढून यावे लागते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे-झुडपे असल्याने वाटेत साप, विंचू चावण्याचे प्रकारही अनेकदा होतात. कधी-कधी आजारी रुग्णांना डोलीतून वांगणीच्या दवाखान्यापर्यंत न्यावे लागते.
दरम्यान, वाघिणीवाडीपर्यंत रस्ता व्हावा, या कर्जत आदिवासी संघटनेच्या मागणीनंतर वन विभागाने रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ता बांधण्यासाठी मोजमापे घेतली होती. मात्र, दोन वष्रे झाली तरी हा रस्ता बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्ता बांधणीचे काम हाती घेतले होते. मात्र, हा रस्ता जंगलातून जातो, अशी भूमिका घेत वन विभागाने रस्त्याचे काम बंद पाडले, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष गोविंद ठोंबरे यांनी दिली.
वाघिणीवाडीपर्यंत जाण्यासाठी रस्ता व्हावा, यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला होता. मात्र, वरिष्ठ कार्यालयाने आम्हाला परवानगी दिली नाही. ग्रामस्थांनी श्रमदान करताना मशीन वापरत असतील तर त्यांच्यावर वन विभाग कारवाई करील.- डी. एस. पाटील, वनक्षेत्रपाल, नेरळ
बेडीसगावापासून गावापर्यंत येणारा रस्ता चढणीचा व जंगलातून जातो. या वाटेत अनेकदा अपघात होत असतात. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर रस्ता बांधून द्यावा.- आंबो राघो वाघ,ग्रामस्थ
घरातील किराण्याचे सामान आणण्यासाठीही दुस-या गावात जावे लागते. तर कधी-कधी रुग्ण व लहान मुलांना खांद्यावरूनच २ किलोमीटरचा रस्ता चढ-उतार करावा लागतो. – राम ढूम, ग्रामस्थ
वाघिणीवाडीमध्ये दोन आदिवासीवाडया आहेत. जर, वन विभाग रस्ता बांधून देणार नसतील तर आम्हीही वन अधिका-याना गावात येऊ देणार नाही. – मंगलीबाई निरगुडे, ग्रामस्थ
आदिवासी श्रमदानाने रस्ता बांधण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे आता वनविभागाने अडथळा आणू नये. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.- जैतू पारधी, खजिनदार, आदिवासी संघटना