अचानक तापमान वाढीमुळे सगळेजणच हवालदिल झाले आहेत. त्यात वणव्यांमुळे बागा जळण्याचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी या दरम्यान अशा घटना घडत असतात. तापमानातील वाढ आणि वाहणारा वारा या वणव्यांना भर घालत असतो.
अचानक तापमान वाढीमुळे सगळेजणच हवालदिल झाले आहेत. त्यात वणव्यांमुळे बागा जळण्याचे प्रमाण वाढत आहे. दरवर्षी या दरम्यान अशा घटना घडत असतात. तापमानातील वाढ आणि वाहणारा वारा या वणव्यांना भर घालत असतो. दुपारच्या वेळीच या भडकणा-या आगीला आटोक्यात आणणेपण मोठे कठीण काम असते. यामुळे मात्र शेतक-यांचे खूप मोठे नुकसान होते.
गेल्याच आठवडयात सौ.भालेकरांचा मुंबईहून त्यांच्या महाळुंगे येथील बागेला आग लागल्याचा आणि बागेत जाऊन नुकसानीच्या अंदाजासंदर्भात फोन आला. मॅडमच्या आवाजातून प्रचंड नुकसान झाले असले पाहिजे असा अंदाज आला. या भालेकर मॅडमने मोठया मेहनतीने ही आंब्याची बाग तयार केल्याचे मी पाहिलेले आहे.सुरुवातीच्या काळात या भागात रस्ते, वीज या प्राथमिक सुविधाही नव्हत्या.
डिझेलच्या इंजिनवर ठिबक सिंचन लावून त्यांनी कातळावर बाग फुलविली. आता ती कुठे फायदेशीर उत्पादन द्यायला लागली तेवढयातच वणवा लागल्याचे समजल्यामुळे त्या हादरल्याच. या पूर्वीही त्यांच्या बागेला आग लागली होती तेव्हा कलमांची पूर्ण छाटणी करून त्यांना बोडरे पेस्ट लावून पाणी देऊन त्यांनी पुन्हा बाग डौलाने उभी केलेली आहे. यापूर्वी आणि यावेळीही शेजा-यांच्या चुकीमुळे त्यांच्या बागेचे नूकसान झालेले आहे.
सध्या वर्तमानपत्रात रोज बागा जळाल्याच्या बातम्या येतात. ब-याच वेळा हे वणवे निष्काळजीपणामुळेच लागतात. काही वेळा विजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडते, त्यामुळे या काळात आपल्या बागेतले गवत काढण्याबरोबरच जागरूकता महत्त्वाची आहे.
पूर्वी आमच्या हुंबरटच्या माळावर दरवर्षी असे वणवे लागायचे. कधी हायवेवरील न विझवलेल्या सिगारेटच्या थोटकामुळे ते लागतात तर कधी दुपारच्या वेळेत आपल्या बागेच्या भोवती आग संरक्षक पट्टा काढताना परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे लागते. पण लगेच गावात संबंधित शेतक-यांना निरोप जात असे आणि सामुदायिकरीत्या त्यावर नियंत्रण मिळविले जात असे.
आता तर बागेभोवती संरक्षित पट्टा काढून हे प्रमाण कमी झालेले आहे. मोठया प्रमाणात आगीने कलमे होरपळली की त्यांचा बुंधा फाटतो, त्यातून चिक निघतो आणि मग त्या झाडाची वाचण्याची शक्यता खूप कमी राहते. यानंतर लगेचच झाडांना पाणी द्यायला हवे म्हणजे ब-यापैकी धोका टळतो.
भालेकर मॅडमच्या बागेत तर या महिनाअखेर बाजारात पाठवता येतील, असे शंभर पेटी आंबे होते. हे मोठे नुकसान आणि त्यात कलमांचा जोम कमी झाल्यामुळे भविष्यातही नुकसान. शेजारच्या शेतक-याने आपल्या बागेतील संरक्षित पट्टा काढताना जी सुकी लाकडे धुमसत होती ती दुस-या दिवशी दुपारी तप्त हवामानामुळे आणि वाहणा-या वा-यामुळे पुन्हा प्रज्वलित झाली आणि आग पसरली.
भालेकर मॅडमच्या बागेतील गवत काढलेले होते त्यामुळे ती मंदगतीने पसरली. पण काढलेले गवत कलमाच्या मुळाशीच आच्छादन म्हणून घातलेले असल्याने आग भडकली आणि कलमांचे नुकसान झाले. या अशा प्रकारच्या बागांना विम्याचे सुरक्षाकवच मिळायला हवे.
या वणव्यांमुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. माळरानांवरील बागांना तर यापासून मोठा धोका असतो. वारंवार लागणा-या या आगीमुळे काही माळरानांवर लागवड करून शेतकरी, सामाजिक वनीकरण थकले आहे. यासाठी आपल्या बागांची काळजी घेणे, इतर शेतक-यांमध्ये या संदर्भात जागृती करणे आणि वणवा लागल्यास सामुदायिकरीत्या त्यास आवरणे आवश्यक आहे. आता यंत्राने गवत कापले जाते.
ठरावीक अंतराने पडणारा पाऊस गवताच्या वाढीला पोषक राहतो. त्यामुळे वारंवार गवत कापणे परवडणारे नसते किंवा त्याबाबतीत चाल-ढकल केली जाते. पण त्यामुळे शेतक-याचे मोठे नुकसान होते. या गवतात विशेष अन्नघटक नसल्यामुळे मोठया प्रमाणात याचा चा-यासाठी वापर होत नाही.
युरिया प्रक्रिया केल्यास त्याचा चांगला आणि बराचकाळ उपयोग होऊ शके ल. या गवतापासून कागदनिर्मिती झाल्यास किंवा इतर काही औद्योगिक उपयोग झाल्यास त्याचा वापर होईल. ते दुर्लक्षित राहणार नाही आणि वणवा लागणार नाही.