महाराष्ट्रासह देशभरात विविध विकृत मानसिकतेपोटी लागणारे, लावले जाणारे वणवे आज पर्यावरणासमोरील खूप मोठी समस्या बनून राहिली आहे. कोकणात तर ‘कुठे ना कुठे, रोज एक वणवा’ अशी भयावह स्थिती आहे. परिसरातील जंगले, कुरणे, किंवा गवताळ भागात नसर्गिक अथवा अनसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग म्हणजे वणवा.
हा वणवा एकदा पेटला की परिसरातील जंगल अगदी महिनाभरसुद्धा जळत राहू शकते. या वणव्यामुळे होणा-या उजाड डोंगरामुळे सर्वत्र निसर्गसौंदर्याला, हिरवळीला हानी पोहोचून जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी आदी अनेकांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. औषधी वनस्पतीही नामशेष झाल्या आहेत. वणवा लागल्यानंतरच्या उपाययोजना हा कितीही प्रयत्न केला तरी अवघड विषय असून वणवा लागूच नये म्हणून ‘प्रतिबंधात्मक उपाययोजना’ यावर शासकीय पातळीवर निरंतर कार्यक्रम राबवून या समस्येचे निराकरण होण्यासाठी प्रयत्न करीत वणवे कायमस्वरूपी रोखायलाच हवेत.
आकाशातून पडणारी वीज, उन्हाळ्यातील उष्णतेने कोरडी पाने व गवत पेटल्याने, मोठी झाडे पडताना होणा-या घर्षणामुळे, गवत व पाने कुजताना निर्माण होणा-या मिथेनसारख्या ज्वलनशील वायूमुळे आदी नसíगक कारणास्तव वणवा पेटतो. कोकणात डोंगर-उतारावर वाढलेले गवत कापण्याचे कामी कोणी स्वारस्य दाखवत नसल्याने विविध जनावरांसाठी उपयोगी असलेले गवत आज वणव्यांसाठी मोठे खुराक ठरते आहे. जंगलात होणारे महावितरणच्या विविध दोन विद्युत वाहिन्यांमधील दाब मोठय़ा प्रमाणात वाढून शॉर्टसíकट होऊन त्यांच्या ठिणग्यातून गवताने पेट घेतल्याने, कळत-नकळत वा एखाद्याचे नुकसान करण्याच्या हेतूने, वैयक्तिक हितासाठी लावण्यात येणारे वणवे, गावागावातून आडवाटेने जाणारे मद्यपी, सिगारेट व विडीचा झुरका घेऊन ती तशीच फेकून देण्याच्या प्रवृत्ती, सुक्या गवतावर ही विडी-सिगारेट पडल्याने लागणारे वणवे सारे प्रकार भयावह असून त्यांचे प्रमाण सर्वदूर प्रचंड आहे. काही वनस्पती वणवा लागून गेलेल्या जमिनींत अधिक जोमाने वाढतात. असे काही फायदे या मानसिकतेमागे असले तरी चोरटी जंगलतोड, जंगलमाफियांकडूनही
हेतूपुरस्सर जंगलांना आगी लावणे, प्राण्यांची शिकार ही यामागील प्रमुख कारणे सांगितली जातात. थंडी संपून उन्हाळा वाढू लागला की कोकणातला वणव्यांचा प्रश्न प्रतिवर्षी ज्वलंत बनू लागतो. तरुणांनी धरलेला मुंबईचा रस्ता, दिवसेंदिवस पडीक राहणारी जमीन, त्या जमिनीत प्रतिवर्षी वाढणारे गवत (तण) आणि ते नष्ट करण्याच्या निमित्ताने लावले जाणारे वा नसíगकरित्या लागणारे वणवे हे अद्यापि एक न सुटणारे दुष्टचक्र बनून राहिले आहे.
वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या राखीव जागेवरही अनेकदा वणवे भडकतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून किंवा कोकणातील अंतर्गत रस्त्यांवरून डिसेंबर ते एप्रिल प्रवास करताना हमखास ठिकठिकाणी वणवे पेटले असतानाची दृश्ये पाहावयाला मिळतात. कोकणात शेतक-यांना भातपिकाशिवाय तरणोपाय नसल्याची मनोभूमिका आजही कायम आहे. मूठभर शेतकरी कोकणातही वर्षभर घरी लागणारे सर्व प्रकारचे धान्य आपल्याच जमिनीत घेण्याची क्षमता राखून आहेत.
आजकाल काही जण मोठय़ा मेहनतीने आंबा, काजू लागवडीकडे वळलेत, वळताहेत. त्यात त्यांना यश येऊ लागले आहे असे वाटावे, तोपर्यंत वणव्यांनी त्या बागेचा कोळसा झालेला पाहण्याची नामुष्की अनेकांवर आली आहे. ज्यातून ‘नको ती शेती’ हाच विचार बळकट बनतो, हे वर्षानुवष्रे कोकणात पाहायला मिळणारे चित्र आहे. वणवा संस्कृती रोखण्याचा प्रयत्न सुजाण नागरिक, स्वयंसेवी संस्था, निसर्गप्रेमी आदी अनेक जण करतात, मात्र या सर्वाना सहकार्य करण्यास शासकीय प्रयत्न, वनविभाग खूपच कमी पडतो असा अनेकांचा अनुभव आहे.
मध्यंतरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली-मळेवाडमधील घोडेमुख जंगलात सतत सहा दिवस वणवा पेटत होता. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. वन कर्मचा-यांना वणवा लागताच कल्पना देऊनही त्यांनी आग विझविण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी यावेळी केला होता. तत्पूर्वी लागलेला एक वणवा ग्रामस्थांनी विझविला होता. मात्र पुन्हा सहा दिवस पेटत्या वणव्यात हजारो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
कोकणात भातशेतीच्या भाजणीसाठी विविध झाडांच्या सुक्या फांद्या तोडून त्या जमवून पेटविल्या जातात. पूर्वी हे करीत असताना आग शेजारच्या जंगलात पसरू नये, याची काळजी घेतली जाई. हे काम एप्रिल-मेमध्ये चाले. मात्र सध्या शेतीची भाजणी ही सुद्धा खूप लवकरच उरकून घेतली जाते. तसेच भाजणीसाठी जंगलातील काटय़ाची झुडपे व इतर पालापाचोळा यांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. पावसाळ्यात आणि तद्नंतरच्या जमिनीतील ओलाव्यामुळे शेतजमिनीत अनेक प्रकारची छोटी-छोटी झाडे, वेली उगवलेल्या असतात. फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान ही रोपटी साधारणत: तीन ते चार फूट उंचीची झालेली असतात. ती काढून टाकण्यासाठी पारंपरिक पद्धत म्हणून जमिनीची भाजणी करतात. वास्तविक ही भाजणी अयोग्य आहे, ती करू नका असे आवाहन कोकण कृषी विद्यापीठाकडून नियमित केले जाते. मात्र तरीही निव्वळ मानसिकतेपायी हे घडते, आणि त्यापुढे यातीलच विकृत मानसिकता जिथे शेती नाही असे जंगलही जाळायला सरसावते, ज्याला आपण ‘वणवा’ म्हणतो. जागतिक स्तरावरही ही पद्धत योग्य नसल्याचे सर्वमान्य झाले आहे. मात्र तरीही आपल्याकडील समाजमन ही पारंपरिक पद्धत सोडण्यास तयार होत नाही.
दरम्यान, यामुळे पाळीव जनावरांना एकेकाळी जंगलात सहज उपलब्ध होणारा भरपूर चारा आता मिळेनासा झाला आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची साधनेही नष्ट होत चालली आहेत. सरपटणारे प्राणीही नष्ट होत चालले आहेत. पक्ष्यांना गवतावरील किडे, बीज खाण्यास मिळत नसल्यामुळे हे पक्षी स्थलांतरित होत आहेत, मृत्युमुखी पडत आहेत. विविध पक्ष्यांचा हिवाळ्यात प्रजनन काळ असतो. नेमके याच दिवसात वणवे पेटविल्यामुळे पक्ष्यांची अंडी, पिल्लेही जळून जातात. त्यामुळे त्यांची संख्याही रोडावत चालली आहे.
सर्प किंवा विंचूदंशावर ‘प्रतिविष लस’ तयार करण्यासाठी त्यांच्याच विषाची गरज असते. यापूर्वी ती कोकणातून पूर्ण होत असे. फुरसे, कांडर, मण्यार, घोणस इत्यादी अनेक विषारी साप जंगलातील दगड, झुडपे यांच्या आश्रयालाच अंडी घालून पिल्लांना जन्म देत असतात. मात्र वणव्यांमुळे सापांची संख्या व प्रजाती नष्ट होत आहेत. भारतीय वन सर्वेक्षणाच्या (एफएसआय) अहवालानुसार देशात सर्वाधिक वणवे लागणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या दहात आहे. बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत, असेही या अहवालात नमूद आहे. वनविभागाकडे असलेले अपुरे मनुष्यबळ हे सुद्धा जंगलात वणवे भडकण्याचे मोठे कारण असल्याचे अहवालात नमूद आहे.
निसर्गाचा समतोल ढासळवणारे हे वणवे रोखणे मानवाच्या हातात आहे. त्याकरिता विविध स्तरांवर जनजागृती गरजेची आहे. सरकारने ‘वणवा मुक्त गाव योजना’ अशा स्वरूपाचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. ‘आमचा गाव, वणवामुक्त गाव’ अंतर्गत गावात फलक जागृती, स्वतंत्र ग्रामसभा, त्यात वणवा रोखणे, वृक्षवल्ली अभियान, वृक्ष संवर्धन याबाबत मार्गदर्शन, त्यासाठी कृतीदल स्थापना, स्थानिक युवकांना वणवा विझवण्याचे प्रशिक्षण, वणवाविरोधी सशस्त्र पथक आदी विविध पर्याय वापरले जायला हवेत. प्रसंगी कायद्याचा, विधायक कामासाठी बळाचा वापर करून ‘वणवा’ संस्कृतीचा कायमचा बंदोबस्त करीत हे वणवे रोखायलाच हवेत, ज्यातून वर्तमान प्रदूषित वातावरणात सर्वानाच मोकळा श्वास घेता येईल.