यंदाच्या उन्हाळ्यात लोडशेडिंग होणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य लोकांचा उन्हाळा सुसह्य केला आहे.
मुंबई – सर्वसामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी…यंदाच्या उन्हाळ्यात लोडशेडिंग होणार नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य लोकांचा उन्हाळा सुसह्य केला आहे.
वास्तविक अंदाजे ३००० मेगाव्हॅट उर्जेचे दोन प्रकल्प गेल्यावर्षी बंद पडले. त्यात कोकणातील दाभोळ प्रकल्प (१९६७ मेगाव्हॅट) आणि परळी येथील औष्णिक उर्जा प्रकल्पांचा (११३० मेगाव्हॅट) यात समावेश आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे लोकांना लोडशेडिंगच्या समस्येला सामोरे जावे लागणार हे निश्चित झाले होते. पण मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. फिक्कीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
परळी औष्णिक वीज केंद्रातील कोळसा हा कोराडी वीज केंद्रात स्थानांतरित करण्यात येणार आहे. तर ओनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीकडून गॅसच्या होणा-या अपु-या पुरवठेमुळे दाभोळ वीज प्रकल्पही बंद करण्यात आला.
राज्यात वीजेची मागणी वाढत आहे. गेल्या आठ वर्षांच्या अभ्यासानुसार ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत वीजेची मागणी ५५०० मेगाव्हॅटने वाढते. त्यातुलनेत राज्यातील वीज उत्पादन प्रक्रिया ही संथगतीने होते. उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात १३ तासांपेक्षा जास्त वेळ लोडशेंडिंग करण्यात येते.