आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून गेली दोन दिवस शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाची मॅरेथॉन बैठक मुंबईत पार पडली.
शनिवारी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हानिहाय बैठका घेतल्या. यात निवडणुकीच्या दृष्टीने सर्व मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.
मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली असल्याचे सांगतानाच राष्ट्रवादी यूपीएसोबतच राहणार असल्याचा निर्वाळा, प्रांताध्यक्ष मधुकर पिचड यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. मात्र, अद्याप नावे निश्चित झाली नसल्याचेही पिचड यांनी या वेळी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत किमान पंधरा जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. येत्या काळात पक्षातील नवीन रक्ताला वाव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण लोकसभा लढवणार का? या प्रश्नावर पक्ष जी जबाबदारी टाकेल ती स्वीकारणार असल्याचे सूचक उत्तर भुजबळ यांनी दिले.