कार्यकर्त्यांसोबतचे ऋणानुबंध सहजासहजी तुटणारे नाहीत, लोकसभेचा पराभव विसरा आणि आगामी विधानसभेच्या यशासाठी कार्यरत व्हा,’’ असे आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
कणकवली- ‘‘मी हरलो नाही, हरणारही नाही! मी माणूस आहे. नैराश्य जरूर असेल पण कोकणच्या मातीशी, येथील जनतेशी गेल्या २५ वर्षात जे संबंध जोडले ते तोडण्यासाठी नाही. तुम्हा कार्यकर्त्यांसोबत असलेले ऋणानुबंध असे सहजासहजी तुटणारे नाहीत. ते अतूट आहेत. लोकसभेतील पराभवाचे शल्य वाटत असले तरी दिवसरात्र काम करणा-या प्रामाणिक कार्यकर्त्यांचे आभार मानावेत यासाठीच मी आज तुमच्यासमोर आलो आहे. आता लोकसभेचा पराभव विसरा आणि आगामी विधानसभेच्या यशासाठी कार्यरत व्हा,’’ असे आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी सिंधुदुर्ग कार्यकारिणीच्या बैठकीत केले.
तुम्ही कार्यकर्ते माझ्या कुटुंबातीलच आहात, ही माझी भावना असून आगामी विधानसभा निवडणुका डोळय़ासमोर ठेवून पुन्हा जोमाने कामाला लागा. मरगळ झटकून टाका आणि सिंधुदुर्गातील तीनही जागांवर विजय मिळविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही राणे यांनी केले.
ओसरगाव येथील महिला भवनाच्या सभागृहात आयोजित कार्यकारिणीच्या बैठकीसाठी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जि. प. अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, विकास सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, अण्णा केसरकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
गेली २५ वर्षे कोकणी जनतेचा विकासाचा ध्यास घेऊन काम करत असताना समाजाच्या गरजा या माझ्या गरजा आहेत, असे समजून मी काम केले. प्रसंगी उसनवारी घेऊन कार्यकर्त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. लोकप्रतिनिधी किंवा साहेबगिरीची भावना ठेवून मिरवलो नाही. कोणाला कमी लेखले नाही. कोणाचे नुकसान होऊ दिले नाही. ज्यांना ज्यांना नावारूपास आणता येईल तेवढा प्रयत्न मी केला. राज्यात इतिहास घडविला, असे राणे यांनी सांगितले.
एक कोकणचा आमदार म्हणून अस्तित्व निर्माण केले इतकेच नव्हे तर मंत्रिमंडळात किंवा सचिव स्तरावरील अधिका-यांपासून जिल्हाधिका-यांपर्यंत कोणीही आपला शब्द टाळू शकत नाही, असा आदर गुणवत्तेने मिळवला. काहींना मी आमदार केले. आपल्याला पराभवाची चीड आली पाहिजे. पराभवानंतर पुन्हा पेटून उठले पाहिजे. मात्र जे जे करायचे ते राणेंनीच करायचे ही पद्धती संपली पाहिजे. सहज पदे मिळाल्यामुळे प्रयत्न कसे करावे लागतात आणि का केले जातात हेच आपण विसरलो. प्रयत्नांचे महत्त्व, त्याची किंमत आपल्याला कळली पाहिजे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
अनेक जण विरोधात बोलतात. आपण ते वाचता आणि स्तब्ध राहता. ही प्रवृत्ती नको. लोकशाही मार्गाने चुकीच्या गोष्टींचा जाब विचारला पाहिजे. प्रामाणिकपणा, निष्ठा, मेहनतीशिवाय कोणतेच यश मिळत नाही, असे सांगताना मिळवलेले यश टिकवण्यासाठीही सचोटी असावी लागते. १९९०-९५ साली जिल्हा कार्यकारिणीला एक -दोनच गाडय़ा असायच्या. आज पार्किंगसाठी जागा नाही. हे यश आहे. मात्र ते एका दिवसात मिळाले नाही. याची जाणीव ठेवा, असा सल्लाही राणे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांवर बाबा सिद्दिकी यांनी टीका केली म्हणून मी केलीच पाहिजे असे नाही, असे सांगून पक्ष विधानसभा निवडणुकीत १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.