लोकसभा व विधानसभा निवडणुका कधीही येऊ शकतील, त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीच्या तयारीला लागावे, असा संदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना दिला.
![CONGRESS MELAWA AT RAVINDRA NATY MANDIR-02](http://prahaar.in/wp-content/uploads/2013/02/CONGRESS-MELAWA-AT-RAVINDRA-NATY-MANDIR-02.jpg)
मुंबई – लोकसभा व विधानसभा निवडणुका कधीही येऊ शकतील, त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीच्या तयारीला लागावे, असा संदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना दिला. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, खाद्यान्न सुरक्षेचा अधिकार आणि ‘आधार’ योजनेच्या माध्यमातून नागरिकत्वाची ओळख करून देण्याचा अधिकार काँग्रेसने जनतेला दिला आहे. पक्षाने केलेल्या योजनांची आणि जनतेच्या अधिकारांची माहिती राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असेही नेत्यांनी सांगितले.
राज्यातील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची बैठक रवींद्र नाटय़मंदिर येथे दुपारी झाली. या कार्यक्रमात काँग्रेसच्या ‘राज्यस्तरीय वचनपूर्ती अभियाना’ची सुरुवात झाल्याचे जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार रजनी पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम, राज्यभरातील तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष उपस्थित या वेळी होते.
काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून द्या
मुंबई – ‘‘राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. दुष्काळी जनतेचे अश्रू पुसण्यासाठी आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार कामाला सुरुवात करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. लोकसभेच्या निवडणुका कधीही येऊ शकतात. काँग्रेस हाच देशाचे नेतृत्व करणारा पक्ष आहे, त्यामुळे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्याचे पतंगराव कदम यांनी सांगितले.
पंतप्रधानपदासाठी भाजपमधील सहा उमेदवार मुंडावळ्या बांधून तयार आहेत. एका राज्यात सत्ता असलेल्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत आहे. परंतु, सामान्यांशी केवळ काँग्रेसचेच नाते जुळते. त्रिशूळ हातात घेऊन फिरणा-या पक्षाला जनता जागा दाखवून देईल, अशा शब्दांत मोहन प्रकाश यांनी भाजपचा समाचार घेतला.
राहुल गांधींनी पंतप्रधान बनावे
राहुल गांधी हे पक्षाचे तरुण नेते आहेत. त्यांनी पंतप्रधान बनावे, असे प्रत्येक कार्यकर्त्यांला मनापासून वाटते. काँग्रेसची मोर्चेबांधणी ही त्यासाठीच सुरू आहे. राहुल गांधी हे उपाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात युवा चेह-यांना संधी दिली जात असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.