विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज करु न दिल्याने अधिवेशन संपण्यास आणखी दोन दिवस शिल्लक असतानाही लोकसभेचे अधिवेशन बुधवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
नवी दिल्ली- पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कायदामंत्री अश्विनीकुमार आणि रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी वारंवार गोंधळ घालून कामकाज करु न दिल्याने अधिवेशन संपण्यास आणखी दोन दिवस शिल्लक असतानाही लोकसभेचे अधिवेशन बुधवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करीत असल्याची घोषणा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुस-या टप्प्यात २२ एप्रिलपासून एक दिवसही कामकाज सुरळीतपणे पार पडले नाही. विरोधकांनी असहकार पुकारल्यामुळे अधिवेशनातील बहुमुल्य वेळ अक्षरशः वाया गेला.
कोळसा घोटाळ्याची चौकशी करणा-या सीबीआयच्या अहवालात कायदामंत्री, पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेप केल्याच्या घटनेनंतर विरोधकांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कायदामंत्री अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावरून सभागृहात गोंधळ घातला. यात, रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या पुतण्याला लाच घेताना सीबीआयने पकडल्याने आणखी एका प्रकरणाची भर पडली. या प्रकरणानंतर विरोधकांनी बन्सल यांच्याही राजीनाम्याची मागणी केली. बन्सल आणि अश्विनीकुमार यांनी राजीनामा देण्याचे कारण नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली.
या गोंधळात काँग्रेसने राष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयक सोमवारी लोकसभेत सादर केले. मात्र विरोधकांचा गोंधळ आणि घोषणाबाजीमुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा विधेयक आणि भूमी अधिग्रहण विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. मात्र, त्यावर कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.