लोकपाल विधेयक हे अतिशय प्रभावी शस्त्र असल्याचे सांगत या विधेयकाला लवकरात लवकर संमत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.
नवी दिल्ली- भ्रष्टाचाराविरोधातील लढाईमध्ये लोकपाल विधेयक हे अतिशय प्रभावी शस्त्र असल्याचे सांगत या विधेयकाला लवकरात लवकर संमत करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. शनिवारी येथे घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काँग्रेसपाठोपाठ प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षानेही विधेयकाला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. तर या विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदींनी आपले पूर्ण समाधान झाले, असे सांगून अण्णा हजारे यांनीही समाधान व्यक्त केले. त्यामुळे लोकपाल विधेयक मंजूर होणे ही आता निव्वळ औपचारिकता राहिलेली दिसते.
या विधेयकावर सोमवारी राज्यसभेत चर्चा होणार आहे. देशाला एक प्रभावी लोकपाल विधेयक देण्याची आपली जबाबदारी आहे. आम्ही त्यामध्ये स्वत:ला जवळजवळ संपूर्ण म्हणजे ९९ टक्के वाहून घेतले आहे. आणि हे विधेयक संमत होण्यासाठी केवळ एक टक्क्याची म्हणजे राजकीय पक्षांच्या सहमतीची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण ख-या अर्थाने हे विधेयक संमत करू शकतो आणि लोकांना लोकपाल देऊ शकतो, असा विश्वास राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.
या विधेयकाला समाजवादी पक्षाकडून होत असलेल्या विरोधाचा उल्लेख करून, हे विधेयक देशाच्या हिताचे आहे हे लक्षात घ्यावे आणि ते अस्तित्वात येण्यासाठी सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी सर्व पक्षांना केले. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी तयार केलेल्या चौकटीमधील माहितीचा अधिकार हे एकमेव प्रभावी शस्त्र होते. या विधेयकामुळे या चौकटीची व्याप्ती वाढणार असून त्यामुळे भ्रष्टाचाराला प्रतिबंध करता येऊ शकेल, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
सरकारच्या हेतूबाबत शंका चुकीची
दिल्लीमध्ये झालेला काँग्रेसचा पराभव आणि अण्णा हजारेंचे उपोषण यांमुळे सरकार लोकपाल विधेयकात रस दाखवत आहे का, असे पत्रकारांनी वारंवार विचारल्यानंतर, राहुल गांधींनी अशी शंका घेणे चुकीचे असल्याचे सांगितले. निवडणुकीतील विजय किंवा पराभव या ठिकाणी महत्त्वाचा नसून, या विधेयकामुळे देशाला होणारा फायदा महत्त्वाचा आहे. त्यामुळे या विधेयकाचा संबंध निवडणूक निकालांशी जोडू नये, असे ते म्हणाले.
संसदेतील गोंधळामुळे मंजुरीला विलंब
हे विधेयक मंजूर व्हावे म्हणून सरकार प्रयत्नांची शर्थ करत आहे. मात्र, संसदेत वारंवार होणा-या गोंधळामुळे संसदेचे कामकाज होऊ शकत नाही आणि त्यामुळे हे विधेयक संमत होऊ शकलेले नाही, याकडे गांधी यांनी लक्ष वेधले.
लोकपाल नव्हे, जोकपाल!
आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी मात्र लोकपाल विरोधाचा हेका सोडलेला नाही. अण्णांना विधेयकाचा मसुदा मान्य कसा झाला, त्यांची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
‘सुधारणा शिफारशी पुरेशा’
या विधेयकावर सोमवारी राज्यसभेत चर्चा व्हावी आणि ते संमत व्हावे, ही भाजपची भूमिका आहे. मात्र काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी सभागृहाचे कामकाज होऊ दिले नाही तर कोणत्याही चर्चेविना हे विधेयक संमत करून घेण्यास आमचा विरोध नाही, असे भाजपने सांगितले आहे. राज्यसभेच्या निवड समितीने लोकसभेत संमत झालेल्या लोकपालचा अभ्यास करून त्यात सुधारणा करण्यासाठी ज्या शिफारशी केल्या होत्या, त्या पुरेशा असून विधेयकाचा हा नवा मसुदा कोणत्याही चर्चेविना वरिष्ठ सभागृहात संमत केला जावा, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी केली.
‘बहुतेक अपेक्षा पूर्ण झाल्या’
लोकपाल विधेयक संमत व्हावे म्हणून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सुधारित लोकपाल विधेयकाबाबत समाधान व्यक्त केले आहे. या विधेयकाबाबत राहुल गांधी यांनी दिल्लीत घेतलेल्या विशेष पत्रकार परिषदेनंतर अण्णांनी लगेचच त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. या विधेयकाबाबत ज्या अपेक्षा होत्या त्यापैकी ब-याच अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. मात्र हे विधेयक राज्यसभेत संमत झाले आणि लोकसभेने त्याला संमती दिली आणि राष्ट्रपतींच्या सहीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाल्यावर आपले उपोषण मागे घेणार असल्याचे अण्णांनी सांगितले आहे.