भ्रष्टाचाराला आळा घालण्यात महत्वपूर्ण असलेले ऐतिहासिक लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे.
नवी दिल्ली- बहुप्रतीक्षित सुधारित लोकपाल विधेयकाला राज्यसभेत मंगळवारी मंजुरी मिळाली. त्यामुळे देशात सशक्त लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त होऊन भ्रष्टाचारविरोधी लढा अधिक प्रखर होऊ शकेल, असा आशावाद निर्माण झाला आहे.
या विधेयकानुसार केंद्रीय स्तरावर लोकपालांची नियुक्ती केली जाणार आहे. या लोकपालला सर्व राज्यांना लोकायुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश देता येणार असून प्रत्येक वर्षी लोकायुक्तांची नियुक्ती करणे बंधनकारक असणार आहे. लोकायुक्ताच्या स्वरूपाचा निर्णय राज्यांच्या विधानसभांवर सोडण्यात आला आहे.
हे विधेयक २०११च्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत मंजूर झाले होते. राज्यसभेत यावर चर्चा झाली मात्र मतदानाआधीच सभागृह तहकूब झाल्याने ते राज्यसभेत मंजूर होऊ शकले नव्हते.
हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मात्र एकटय़ा लोकपालामुळे भ्रष्टाचार नष्ट होणार नसल्याचे कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी चर्चेदरम्यान सांगितले. भ्रष्टाचार करणा-यांविरोधात हा कायदा असला तरी एकट्या कायद्यामुळे भ्रष्टाचार संपूर्ण नष्ट होणार नाही, असे ते म्हणाले.
विधेयकामध्ये केलेल्या बदलांच्या मंजुरीसाठी हे विधेयक लोकसभेकडे पाठवण्यात येणार असून बुधवारी लोकसभेत यावर चर्चा अपेक्षित आहे.
अण्णा हजारे समाधानी
लोकपाल विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले आहे. विधेयक मंजूर झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आभार मानले. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर उपोषण सोडणार असल्याचे अण्णा यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराला आळा घालण्यात महत्त्वपूर्ण असलेले हे ऐतिहासिक लोकपाल विधेयक राज्यसभेत मतदानानंतर मंजूर झाल्याचे राज्यसभेचे अध्यक्ष हमिद अन्सारी यांनी घोषित केले. सपा वगळता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी लोकपाल विधेयकाच्या बाजूने मतदान केले.
राज्यसभेच्या मंजूरीनंतरक आता लोकसभेत या विधेयकाला मंजूरी द्यावी लागणार आहे. बुधवारी हे विधेयक लोकसभेत सादर केले जाणार आहे.
दरम्यान, लोकसभेत या विधेयकाला नक्की पाठींबा मिळेल, असा विश्वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरच आपण उपोषण सोडणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले.
तत्पूर्वी, लोकपाल विधेयक आणल्याबद्दल अण्णा हजारे यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून आभार मानले. ‘देश लोकपालाच्या प्रतिक्षेत आहे. राहुल लोकपाल विधेयकासाठी तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आभार मानतो’ असे अण्णांनी लिहीले आहे.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधीनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकपाल विधेयकासाठी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंब्यासाठी आवाहन केले होते तसेच भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी लोकपाल विधेयक गरजेचे आहे असे सांगितले होते.
राहुल गांधींनीही अण्णाचे लोकपाल विधेयकासाठी दिलेल्या लढ्याबाबत पत्राद्वारे आभार मानले. लोकपाल विधेयकाला विरोध करणा-या समाजवादी पार्टीलाही अण्णांनी विनंती केली होती. मला आशा आहे की, सगळेच पक्ष विधेयकाला मान्यता देतील आणि हे विधेयक मंजूर होईल, असा अण्णांनी विश्वास व्यक्त केला. गेल्या आठ दिवसांपासून राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांचे उपोषण सुरु आहे.