लालबाग-परळ परिसरात रविवारी निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणानंतर पोलिसांनी चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.
मुंबई – लालबाग-परळ परिसरात रविवारी निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणानंतर पोलिसांनी चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. प्रामुख्याने लालबाग, वरळी, परळ, दादर व भायखळा परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणी बेकायदेशीर जमाव व दंगलीचे गुन्हे काळाचौकी, भोईवाडा, भायखळा व वरळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून, कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक परिमंडळ) आर. डी. शिंदे यांनी दिली.
तसेच आणखी एका ठिकाणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रविवारी अनोळखी व्यक्तींकडून वरळी येथे एका स्कूटरचे, परळ येथील आयटीसीजवळ एक मोटरसायकल व एक गाडीचे नुकसान करण्यात आले. संपूर्ण घटनेत सहा ते सात जण किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, भायखळा येथेही रस्त्यावर दगडफेक करण्यात आल्यामुळे तेथेही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत कोणीही जखमी झाली नाही. घटनेनंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण परिसरात पोलिसांसह दंगलविरोधी पथक, राज्य राखीव पोलिसांच्या अतिरिक्त तुकडय़ांना तैनात केले.
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थिती संयमाने हाताळल्यामुळे सकाळपर्यंत तणाव निवळला. दरम्यान, सोमवारीही सोशल नेटवर्किंग साईटवर अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी दुचाकीने घटनास्थळी
नागपाडा येथे रविवारी उरुसनिमित्त बंदोबस्त असल्यामुळे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिंदे व इतर वरिष्ठ अधिकारी तेथे बंदोबस्ताची पाहणी करत होते. पण लालबाग परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तात्काळ लालबागला धाव घेतली. भायखळा उड्डाणपुलाजवळ वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे सर्व वरिष्ठ पोलिसांच्या गाडय़ा तेथे अडकून पडल्या. अखेर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी कनिष्ठ अधिका-यांच्या दुचाकीवर बसून घटनास्थळ गाठले.