जूनमध्ये बेधुंदपणे कोसळलेल्या पावसाने ओढ लावल्याने रायगड जिल्ह्यातील भातशेती संकटात आली आहे.
अलिबाग – जूनमध्ये बेधुंदपणे कोसळलेल्या पावसाने ओढ लावल्याने रायगड जिल्ह्यातील भातशेती संकटात आली आहे. पावसाच्या या लहरीपणामुळे लावणीची कामे खोळंबली असून खारेपाटातील शेतक-यांवर दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुबार पेरणी करावी लागलीच तर जिल्हा कृषी विभागाने २ हजार ५०० क्विंटल भात बियाणांची तजवीज करून ठेवली आहे. याशिवाय शेतक-यांना बियाणे प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जात आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जिल्ह्यात धुवाधार सलामी दिल्याने शेतक-यांनी पेरणीची कामे करण्यास सुरुवात केली होती. जोरदार पाऊस झाल्याने रोपे कुजू नयेत यासाठी खाचरातील पाणी शेतक-यांनी सोडून दिले. रोप वाढली मात्र, पावसाने दडी मारली. पंधरा दिवसांपासून अंग जाळणारे ऊन पडत असल्याने रोपे करपण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशातच बुधवारपासून पावसाचे आगमन झाले आहे. मात्र, ते समाधानकारक नाही. पावसाची सर येऊन जाते. नंतर पुन्हा ऊन पडते. या रिमझिम पावसाने रोपांना संजीवनी मिळाली आहे. मात्र, शेतात पाणी नसल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. सखल भागात पाणी आहे तेथे लावणी सुरू झाली . जिल्ह्यात केवळ १० टक्केच लावणीची कामे झाली आहेत.
अलिबाग, पेण, पनवेल, उरण, रोहा, मुरुड या तालुक्यांमधील खारेपाटातील शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. या भागात धुळपेरणी सुरू करण्यात आली आहे. जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे रोप वाढली. रोप कुजू नये म्हणून शेतक-यांनी बांध फोडून शेतातील पाणी जाऊ दिले. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. आत रोप वाढली. पण शेतात पाणी नसल्याने लावणी करता येत नाही. जर लावणी वेळेत झाली नाही तर रोपांचे वय वाढेल त्याचा परिणाम फुटव्यांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कृषी विभागाकडून खतांची विक्री
रायगड जिल्ह्यासाठी १७ हजार मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी १३ हजार ८० मेट्रिक टन खात उपलब्ध झाले आहे. शेतक-यांनी आवशक असलेली खते ही विक्री केंद्रावरून घेऊन जावीत. गरजेनुसार खते न्यावीत खतासंदर्भात माहिती हवी असल्यास पंचायत समिती, कृषी विभाग किंवा कृषी विकास अधिका-यांशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.