ललित मोदी प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत गुरुवारी स्पष्टीकरण दिल्यानंतर कॉँग्रेसने त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर नव्याने हल्लाबोल केला.
नवी दिल्ली- ललित मोदी प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत गुरुवारी स्पष्टीकरण दिल्यानंतर कॉँग्रेसने त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्यावर नव्याने हल्लाबोल केला.
ललित मोदींकडून स्वराज यांच्या कुटुंबीयांना किती पैसे मिळाले हे त्यांनी देशासमोर जाहीर करावे. या प्रकरणात सुषमा स्वराज यांनी गुप्तता का पाळली ? त्यांनी आपल्या खात्याला अंधारात का ठेवले ? असा जळजळीत सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला.
सुषमा स्वराज, शिवराज सिंह चौहान व वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने ठाम भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी संसदेत जोरदार आवाज उठवला आहे. कॉँग्रेस खासदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस व विरोधी पक्षांनी सलग चौथ्या दिवशीही आपला निषेध संसदेच्या आवारात कायम ठेवला.
तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी स्वराज यांच्या पत्नी व मुलीला ललित मोदी यांच्याकडून किती पैसे मिळाले, हे संपूर्ण देशातील जनतेला सांगावे, अशी मागणी राहुल यांनी केली. स्वराज या बोलण्यात चतुर असून, मात्र त्यांचे भाषण निराधार आहे. कारण त्यांचे जेव्हा भाषण झाले तेव्हा विरोधी पक्षातील कोणीही संसदेत नव्हते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
चोरी ही कायमच लपूनछपून केली जाते. त्यासाठी या प्रकरणात गुप्तता पाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच माझ्या आईने आरोपीला कधीही मदत केली नसती, असे मी ठामपणे सांगू शकतो, असे गांधी यांनी सांगितले.
चिदंबरम यांचीही स्वराज यांच्यावर टीका
नवी दिल्ली- स्वराज यांनी लोकसभेत दिलेल्या निवेदनावर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीकेची झोड उठवून त्यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. स्वराज यांना आपल्यावरील आरोप मान्य नाहीत, मात्र इंग्लंडचे उच्चायुक्त जेम्स बेव्हन किंवा ब्रिटनचे खासदार किथ वाझ किंवा सुषमा स्वराज यापैकी नेमके कोण खरे बोलत आहेत, हा प्रश्न आहे.
स्वराज यांना मोदी यांच्या पत्नीला वाचवायचे होते, तर त्यांनी भारतीय उच्चायुक्तांना तात्पुरत्या भारतीय प्रवासी कागदपत्रांवर केवळ पोर्तुगालला जाण्याचे निर्देश द्यायला हवे होते. ते त्यांनी केले नाही, असा प्रश्न चिदंबरम यांनी विचारला.