निसर्गसंपन्न असलेले, ऐतिहासिक वारसा लाभलेले व तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, स्वच्छता अभियान पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार आदींनी सन्मानित झालेले सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या पूर्वेकडील कुडाळ तालुक्यातील, निसर्गसमृद्ध गाव म्हणजे ‘शिवापूर’!
शिवापूर – निसर्गसंपन्न असलेले, ऐतिहासिक वारसा लाभलेले व तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, स्वच्छता अभियान पुरस्कार, पर्यावरण विकासरत्न पुरस्कार आदींनी सन्मानित झालेले सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या पूर्वेकडील कुडाळ तालुक्यातील, निसर्गसमृद्ध गाव म्हणजे ‘शिवापूर’! या गावाच्या चहुबाजूंनी सृष्टीसौंदर्याने नटलेले डोंगर तर दुस-या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘मनोहर मनसंतोष गड’ आहे. या ऐतिहासिक गडामुळे पर्यटकांची बारमाही ये-जा येथे सुरू असते. ‘शिवा’ म्हणजे शिवाजी व ‘पूर’ म्हणजे वास्तव्य यावरून या गावाला शिवापूर असे नाव पडले.
आकेरी-शिवापूर या जिल्हाप्रमुख मार्गावरील शेवटचे ठिकाण व निर्मला (कर्ली नदीचे) उगमस्थान असलेल्या या शिवापूर गावात शिवाजी महाराजांचे ३३ दिवस वास्तव्य होते. चुन्याची भट्टी लावलेल्या भागाला ‘चुन्याची भटी’ व गडावर सामान नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खेचरांची जागा म्हणजे ‘खेतरपाळ’ इत्यादी ऐतिहासिक स्थळे येथे आहेत. तर ‘भिमाचा दांडा’ हे पांडवकालिन क्षेत्र आहे. याच गावात संभाजी महाराजांनी दारूगोळा कारखाना सुरू केला. तर टाकसाळही याच ठिकाणी सुरू केले होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावरूनच सावंतवाडीकर भोसले, वेंगुल्र्यातील डच आणि गोवा फोंडय़ापर्यत मराठय़ांचा झेंडा रोवला गेला.
या गावात आरोग्य केंद्र, पोस्ट, ग्रामपंचायत, मोबाइल टॉवर, प्राथमिक शाळा, पूर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आहे. रवळनाथ-भैरव मंदिर आहे. ग्रामपंचायतीची स्थापना १९५६ मध्ये झाली असून ग्रामपंचायत सदस्य सात आहेत. गावाचे क्षेत्रफळ २१४२ हेक्टर तर लोकसंख्या ९८८ आहे. गडकरवाडी, सुतारवाडी, कोठीवाडी, हरिजनवाडी, गाववहाळवाडी, पाटकर-झिमणेवाडी, सावंतवाडी अशा वाडय़ा आहेत. गावात तीन नळ पाणीपुरवठा सुविधा कार्यान्वित आहेत. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेंतर्गत हजारो रोपांची लागवड येथे करण्यात आली आहे. गावातून जास्तीत जास्त (किमान घरात एक) भूमिपुत्र सैन्यात भरती झाले त्यामुळे या गावाला सैनिकांचा गाव म्हणूनही ओळखले जाते.
उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार डॉ. निलेश राणे व स्थानिक नेता मोहन सावंत यांच्या माध्यमातून या गावाने सर्वागीण विकास साधला आहे. येथील वाहतूक सुविधाही बारमाही आहे. तसेच संपर्कासाठी ३० ते ४० किलोमीटर दूर जावे लागत होते. आता गावातच मोबाइल टॉवर आहे. तीन नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत.
शिवापूर गाव पर्यटनदृष्टय़ा महत्त्वपूर्ण असल्याने पायाभूत-मूलभूत सुविधांची गरज आहे. स्वच्छ गाव, सुंदर गाव, हरित गाव व तंटामुक्त असलेले शिवापूर हे गाव तालुक्यापासून सुमारे ३९ किमी. दूर आहे. सहय़ाद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात विकासाच्या दृष्टिकोनातून सरकारच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. ग्रामपंचायत शिवापूर ही इमारत सुसज्ज बांधलेली आहे. यशवंत समृद्ध योजनेतून दोन ठिकाणी कॉजवे बांधून बारमाही वाहतूक सुविधा नसलेल्या दुर्गम भागात बारमाही वाहतूक सुरू केली आहे. भारत निर्माण योजनेतून तीन नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या. पर्यावरण संतुलित समृद्धी पुरस्कार योजनेंतर्गत स्मशान शेडस्, मो-या, पथदिवे, रस्ते दुरुस्ती इत्यादी कामे येथे झाली आहेत.