माड बागायती सध्या धोक्यात आल्या असून किडीरोगाने माड सातत्याने वाळत आहे.
दोडामार्ग– माड बागायती सध्या धोक्यात आल्या असून किडीरोगाने माड सातत्याने वाळत आहे. याबाबत कृषी विभागाकडे कोणतेही प्रतिबंधात्मक औषध नाही, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आर. डी. कांबळी यांनी सांगितले. या माडांचे पंचनामे करावेत व माहिती तालुका कार्यालयाला द्यावी, असे आवाहनही त्यांनी शेतक-यांना केले आहे.
नारळाला दैनंदिन जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गृहिणींचा ‘सोबती’ म्हणून नारळाला उपमा दिली, तर ती वावगी ठरू नये. कोकणातील जनतेच्या दैनंदिनीशी नारळाचे नाते घट्ट आहे. नारळाचा सर्वच दृष्टीने संसाराला नेहमीच उपयोग होत असल्याने या झाडाला ‘कल्पवृक्ष’ असे संबोधले जाते. एक माड एक कुटुंब पोसते, असे वेळोवेळी म्हटले जाते आणि ते सत्यही आहे.
माडाची योग्य मेहनत आणि निगा राखल्यास एका माडापासून एका कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. मात्र, आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. महागाईचा भस्मासूर वाढत चालला आहे. माड झाडांवर अनेक कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने नारळ उत्पादन घटत चालले आहे. त्याशिवाय हवामानातील बदलांचाही माडापासून नारळ उत्पादनावर परिणाम होत आहे. अनेक उत्पादनात नारळबागा कीड-रोगांमुळे उद्ध्वस्त होत आहेत. जिल्ह्यात नारळ क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असूनही अपेक्षित उत्पादन मात्र, मिळत नाही. सध्या सर्वच बाजारपेठेत नारळाला वाढती मागणी असल्याचे चित्र दिसते.
दोडामार्ग तालुक्यातील शिरवल, कुंब्रल, तळकट, झोळंबे, केर, घोटगेवाडी, कोनाळ भागात नारळ बागा आहेत. शिवाय सुक्या खोब-यालाही चांगला दर मिळत असल्याने तेल बनवण्यासाठी नारळाची मागणी वाढली आहे. चांगला दर असला तरीही सध्या नारळ बागायतदारांकडे नारळच उपलब्ध नसल्याचे सर्रास बोलले जात आहे. कोकणात मोठया प्रमाणात नारळ उत्पादन घेतले जाते. मात्र, असे असूनही मागणीच्या तुलनेत हे प्रमाण तसे कमीच आहे. परिणामी स्थानिक बाजारपेठांमधूनही नारळाचे दर १० रुपयांच्या बाहेर गेले आहेत. नारळाचे उत्पादन घटण्यास प्रमुख कारण माड बागायतीवर लागलेला रोग हे आहे.