![संग्रहित छायाचित्र](http://prahaar.in/wp-content/uploads/2015/02/railway.jpg)
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा दावा रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येतो. मात्र रेल्वे हद्दीतील वाढती गुन्हेगारी पाहता रेल्वे प्रशासनाचा दावा फोल ठरत आहे का? चोरटयाने बॅग पळवल्याने महिला प्रवासीने चोराला पकडण्यासाठी पाठलाग केला असता लोकलची धडक लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असून याला जबाबदार कोण? रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी वाढण्यास संबंधितच जबाबदार आहेत का? रेल्वेतील अंतर्गत गुन्हेगारी रोखण्यास मनुष्यबळाचा अभाव कारणीभूत आहे का? रेल्वे हद्दीतील वाढती गुन्हेगारी व महिला प्रवाशांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी योग्य त्या नियोजनाची गरज आहे का? रेल्वे हद्दीत प्रवाशांची लूट होत असताना सहप्रवाशाने मदतीसाठी धाव घेतली पाहिजे का?
रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वा-यावरच
मुंबई उपनगरीय रेल्वेची जीवनवाहिनी म्हणून जगभरात ओळख असून दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र गेल्या काही वर्षात रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी वाढत असून याला संबंधित यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला आहे.
विशेष करून महिला प्रवाशांच्या सुरक्षेकडे अधिक भर दिला पाहिजे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य ते नियोजन केले पाहिजे, असा सल्ला वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला आहे. प्रवाशांवर अन्याय होत असल्यास सहप्रवाशाने मदतीसाठी धाव घेतली पाहिजे.
रेल्वे हद्दीतील सुरक्षा गस्त वाढवली पाहिजे. एकूणच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असून अनधिकृत फेरीवाल्यांना हद्दपार केले पाहिजे, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून नोंदवले.
वाढत्या गुन्हेगारीला रेल्वे प्रशासन जबाबदार
रेल्वे प्रवास म्हणजे जीवावर टांगती तलवार, याचा प्रत्यय येणारी घटना नुकतीच घडली. रेल्वे हद्दीत धावत्या गाडीतील प्रवाशांना मारझोड करून अज्ञात चोरटय़ांच्या टोळीने चाकू दाखवून महिलेकडून रोख रक्कम, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेतल्या.
गाडी स्टेशनमध्ये येण्यापूर्वीच चोरटय़ांनी साखळी ओढून गाडी थांबवली व अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. रेल्वे हद्दीतील वाढती गुन्हेगारी पाहता रेल्वे मंत्रालयाने गुन्हेगारीला व अपघाताच्या घटना रोखण्यासाठी नवे धोरण, नवी यंत्रणा व त्याच वेगाने आता सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
यावरून प्रशासनाला प्रवाशांच्या सुरक्षिततेची किती काळजी आहे, हे दिसून येते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे प्रवासी जीवानिशी जात आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाबाबत फार सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच या रेल्वे हद्दीतील वाढती गुन्हेगारी व महिला प्रवाशांवरील वाढते अत्याचार रोखण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केले जातील ही अपेक्षा.
– कमलाकर जाधव, बोरिवली
रेल्वे परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी
लोकल ट्रेनमध्येही महिला सुरक्षित नसल्याचे आढळून आले आहे. गेल्या काही वर्षात रेल्वे हद्दीतील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेकडे स्वत:चे लोहमार्ग पोलीस दल आहे. यात महिला पोलीसही आहेत, त्यामुळे लोकलमधील महिला डब्यांमध्ये चोख सुरक्षाव्यवस्था ठेवणे रेल्वे प्रशासनाला शक्य आहे.
रेल्वे परिसरात आणि डब्यात महिलांचे मोबाईल चोरणे, विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. खिसेकापू, दारूडे, अमली पदार्थ विक्रेते, गर्दुल्ले यांचे रेल्वे हे जणू आश्रयस्थानच बनले आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी रेल्वेने रात्री फिरती पथके तैनात करावीत. रेल्वे परिसरात रात्री गस्त वाढवणे आवश्यक आहे. प्रवासी स्त्री असो की, पुरुष सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वेचीच आहे.
– दादासाहेब येंधे, काळाचौकी
रेल्वे प्रवास हा चिंतेचा विषय
रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय आहे. महिला प्रवाशांची सुरक्षितता वा-यावर असल्याचे दिसून आलेले आहे. लोकलची धडक लागलेली प्राजक्ता गुप्ते या महिलेचा चोराला पकडण्याच्या नादात मृत्यू झाला. सहप्रवाशाला मदत करण्याचे काम मात्र निश्चितच कौतुकास्पद आहे.
महत्त्वाची बाब येथे नमूद कराविशी वाटते की, ‘या महिला प्रवास करीत होत्या त्या डब्यात पोलीस नव्हते, असं का? रेल्वेचे प्रवासी लोंबकळत प्रवास करतात. सकाळी व सायंकाळची गोष्ट वेगळी. सर्वच प्रवासी अनेक कारणांनी घाईगर्दीत प्रवास करतात. कोणालाही कोणाशी देणे घेणे नसते.
सहप्रवाशांच्या मदतीला गेलं पाहिजे ही ‘नैतिकता’ झाली, परंतु जीवघेण्या घटनेपासून प्रत्येकालाच सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वत:ची काळजी स्वत:च घेतली पाहिजे हेच खरे आहे.
– अनंत दाभोळकर, अंधेरी
नियोजनपूर्वक प्रयत्न आवश्यक
रेल्वे प्रवाशांचे स्थानिक आणि बाहेरगावचे असे दोन प्रकार असून पैसे खर्च करूनही त्यांना सुरक्षित प्रवासाची हमी मिळत नाही. प्रवाशांना दमदाटी करणे, वस्तू चोरून त्यांना चालत्या गाडीतून बाहेर ढकलून देणे इत्यादी अनेक प्रकारचे गुन्हे घडत असून फलाटावरील चो-यांसारखे गुन्हे, हमाल, टॅक्सी किंवा रिक्षावाल्यांकडून होणारी लुबाडणूक ही वेगळी आहे. त्यामुळे गुन्ह्यांचे स्वरूप, त्याची कारणे व करायच्या उपाययोजना यांचा अभ्यास करण्यास एक समिती नेमून त्यामार्फत वेगवेगळ्या गुन्ह्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचवावेत.
त्यांच्या अंमलबजावणीवर माहिती अधिकाराद्वारे प्रवासी संघटनांनी नियंत्रण ठेवावे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या प्रमाणात गाडय़ांची संख्या व स्थानकांवरील सोयीसुविधा वाढवणे व रेल्वे प्रशासन आणि पोलिसातील भ्रष्टाचारास आळा घातल्यास ब-याच जणांचा प्रवास सुरक्षित होईल.
– डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम
रेल्वेची रामभरोसे सुरक्षा!
लोकसंख्येच्या मानाने रेल्वेची सुरक्षा रामभरोसे आहे. प्लॅटफॉर्मवर भिका-यांपासून गर्दुल्ले व चोरांचा वावर जास्त असतो, महिला डब्यात जेव्हा पोलीस हवा त्याचवेळी ते गायब असतात. कधी कधी दोन दोन पोलीस असतात. यावरून महिलांबाबत रेल्वेची सुरक्षा यंत्रणा मनापासून काम करत नाही, असे दिसून येते.
रेल्वेच्या प्लॅटफॉर्मपासून रेल्वे पुलावर व पाय-यांवर सर्वत्र बेफिकीरपणा वाढला आहे. केवळ ठरावीक स्टेशनवर दिसणारे पोलीस तेही आता दिसेनासे झालेत. यावरून मनुष्यबळाचा अभाव दिसतो. प्रवासांवरील व विशेषत: महिलांच्या संरक्षणाबाबत रेल्वेने जातीने दखल घ्यावी. तसेच एखाद्या प्रवाशाला त्रास होत असेल तर सहप्रवाशांनी अशावेळी मदत करणे महत्त्वाचे आहे. बघ्याची भूमिका सोडावी, कारण कधी तोच प्रसंग सर्वावर येऊ शकतो याची रेल्वे प्रवाशांनीही दखल घ्यावी!
– सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी
पोलिसांची गस्त वाढवावी
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रवासी सुरक्षित नाहीत, कारण या गर्दीचा फायदा चोर, समाजकंटक घेत असतात. रेल्वे प्रशासनाकडून केला जाणारा सुरक्षेचा दावा कोणत्याच निकषावर खरा उतरत नाही. कारण वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेता मनुष्यबळाचा अभाव दरवेळी दिसून येतो. रेल्वे हद्दीतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता रेल्वे पोलिसांनी गर्दीच्या वेळी अधिक मनुष्यबळ तैनात करावयास हवे.
खासकरून महिला प्रवाशांवरील अत्याचार रोखण्यासाठी महिला डब्यांजवळ गस्त वाढवणे महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेची आहे. हे चोर आजूबाजूच्याच परिसरातील असतात. त्यासाठी खब-यांच्या साहाय्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे जाईल. सहप्रवाशानेही अडचणीच्या वेळी मदतीला धावून गेले पाहिजे. तरच गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल.
यात सर्वप्रथम प्रवाशांची सर्तकता महत्त्वपूर्ण आहे. सजगता दाखवून अनोळखी वस्तू, व्यक्ती याची माहिती जवळ असणा-या रेल्वे पोलिसांना कळवायला हवी. गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असलेल्या स्थानकांवर साध्या वेषातील पोलिसांची गस्त वाढवण्याच्या दृष्टीने पाऊले उचलायला हवीत. त्याचबरोबर महिला प्रवाशांनी फुटबोर्डवर उभे न राहता गर्दीच्या वेळी सुरक्षा म्हणून आतमध्ये राहून प्रवास करायला हवा. आपली सुरक्षा आपणच करायला हवी. रेल्वे प्रशासनाला आपणच जागे करायला हवे.
– गणेश राऊत, काळाचौकी
रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित कधी होणार?
रेल्वे प्रशासन ‘रेल्वेत’ सुधारणांसाठी ‘यंत्रणेत-परिवर्तन’ व सुरक्षिततेचा वेळोवेळी जरी दावा करत असले तरी रेल्वे हद्दीतील वाढती गुन्हेगारी व प्रवाशांची सतत होणारी गैरसोय यामुळे तो फोलच ठरत आहे. एकतर मुळातच रेल्वेत प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत मनुष्यबळाचा अभाव आहेच. दुसरं म्हणजे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व प्रवाशांची तत्पर व सक्रिय कृतिशीलता व उत्स्फूर्त सहभाग आणि परस्पर समन्वयाची कमतरता दिसून येते.
म्हणून रेल्वे हद्दीत घडणा-या अनपेक्षित अनुचित घटनांना ‘सर्वच संबंधित’ जबाबदार आहेत. म्हणून रेल्वे प्रशासनात, कर्मचारी वर्गात आलेली असंवेदनशीलता, उदासीनता व सुस्ती आणि त्रुटी दूर करण्यासाठी वेळोवेळी उद्बोधनाची व प्रवाशांसाठी सुलभ प्रबोधनाची व्यवस्था, त्यांच्या सवडी व सोयीनुसार राबवण्याची अनिवार्यता अधोरेखित होते. अशा प्रकारच्या योग्य नियोजन, प्रबोधन व संघटनेतूनच परस्पर समन्वय प्रस्थापित होऊन संघर्ष टळेल व अनपेक्षित गोंधळ व एकूणच रेल्वेत असणारी वास्तव अनागोंदी थांबेल.
– सी.के. बावस्कर, परळ
सुविधा देण्याआधी योग्य नियोजनाची गरज
मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना योग्य त्या सुविधा देत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र आरपीएफ व रेल्वे पोलिसांच्या वादात प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असून याला संबंधित यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून केला आहे.
प्रवाशांना सुविधा देण्याआधी योग्य ते नियोजन रेल्वे प्रशासनाने करावे, असा सल्ला वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांवर कुठला प्रसंग ओढावल्यास सहप्रवाशाने मदतीस धाव घ्यावी. प्रवाशांना सुरक्षा व सुविधा देताना प्रवासी संघटना व प्रवाशांना विचारात घ्यावे, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून नोंदवले.
एकूणच रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाने जागरूकता दाखवावी. तसेच महिला प्रवाशांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवावी, असा सल्लाही वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला.
सुरक्षेचा दावा फोल
अलीकडे रेल्वे हद्दीत वाढत असलेली गुन्हेगारी लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांनी सावध राहण्याची गरज आहे. हजारो लोक रोज लोकलने प्रवास करतात, त्यावेळी महिला प्रवाशांसोबत अनेक अपघात, गुन्हे घडत आहेत. यासाठी योग्य नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. प्रवाशांची सुरक्षा होते हा रेल्वे प्रशासनाचा दावा फोल ठरत आहे.
– अनिता साळुंखे, गोरेगाव
नियोजनाचा अभाव
चोरटयाने बॅग पळवल्याने महिला प्रवाशाने चोराला पकडण्यासाठी पाठलाग केला असता लोकलची धडक लागून तिचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली, याला जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन हे गुन्हे रोखण्यासाठी कितपत कार्यशील आहे? रोज अशा घटना घडत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे.
– सुवर्णा शिंदे, मालाड
अजूनही रेल्वे असुरक्षितच
रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी खूप वाढली आहे. रेल्वे प्रशासन एवढया योजना राबवत आहे. पण त्याचा उपयोग मात्र होताना दिसत नाही. स्त्रिया अजूनही असुरक्षितच आहेत. कधी कधी प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे सुद्धा अपघात घडतात. पण त्यासाठी रेल्वे प्रशासनाने गार्डच्या नियुक्तीत वाढ करावयास हवी.
– अमृता शेलार, मालाड
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वेगळा विभाग हवा
आपल्याबरोबर प्रवास करणारा सहप्रवासी कोणत्या उद्देशाने ट्रेनमधून प्रवास करतोय हे काही सांगता येत नाही. म्हणून आपल्यालाच प्रवास करताना सतर्क राहावे लागेल. पोलीस यंत्रणा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी सक्षम केली पाहिजे किंवा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसमध्ये एक वेगळा विभाग बनवला पाहिजे. हा विभाग प्लॅटफॉर्मवर उभ्या असणा-या लोकांवर नजर ठेवील किंवा चालत्या ट्रेनमध्ये चढणा-या लोकांवर नजर ठेवील. या प्रकारे प्रवाशांना सुरक्षा दिली गेली तरच रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी कमी होईल आणि गुन्हेगारही त्वरित पकडला जाईल.
– मनीष जाधव, मीरा-रोड
महिला रेल्वे डब्यातही सुरक्षितता नाही
महिलांना रस्त्यावरून चालताना छेडछाडीच्या प्रकरणांना सामोरे जावे लागते. आता तर रेल्वे हद्दीमध्ये महिलांवर होणा-या अत्याचाराच्या गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. अशावेळी लोकल ट्रेनच्या डब्यात घडलेली घटना ही गोष्ट सिद्ध करते की, महिला या लोकल ट्रेनमध्येही सुरक्षित नाहीत. त्यामुळे प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही दिवसेंदिवस गंभीर होत चालेला आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे असणारे प्रवासीही सध्या असुरक्षित आहेत. त्यामुळे रेल्वे हद्दीतील गुन्हेगारीवर आळा बसविणे गरजेचे आहे.
– अंकिता दळवी, दादर.
कमी गर्दीच्या वेळी प्रवाशांनी सर्तक राहा
डफली वाजवून पैसे गोळा करणारे तसेच लोकल ट्रेनच्या डब्यात येणारे भिकारी यांच्यावर प्रशासनाने बंदी आणली पाहिजे. कारण ही माणसे डब्यात येऊन नकळत चोरी करतात. अनेक वेळा प्रवाशांची गर्दी कमी आहे हे बघून प्रवाशांची पाकिटं घेऊन पळणे यासारखे प्रकार घडतात.
कधी कधी तर एखाद्या प्रवाशावर नजर ठेवून त्याचा पाठलाग करून चोरी करणे किंवा प्रवाशाला लुटणे यांसारख्या गोष्टी घडतात. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई केल्यास गुन्हेगारी कमी होईल. रेल्वे हद्दीत घडणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. सरकारनेही यावर लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
– जयेश पाटील, माहीम.
सुरक्षिततेसाठी तरुणांना नियुक्त करा
सरकार रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी जर त्वरित रोखू शकली नाही तर, हा गंभीर प्रश्न बनेल आणि त्याचे दुष्परिणाम प्रवाशांना भोगावे लागतील. आज अनेक बेरोजगार तरुण आहेत. सरकारने अशा बेरोजगारांची प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नियुक्ती केले तर, अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकारने मनुष्यबळ वाढवणे गरजेचे आहे. यामुळे अनेक तरुणांना रोजगार तर उपलब्ध होईलच.
– गजानन चव्हाण, मालाड
सुरक्षा वाढवणे गरजेचे
बाहेर येण्याकरिता प्रयत्न करीत असताना कुणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही आणि बाहेर फेकल्या गेलेल्या तरुणीचाच एक पाय चाकाखाली आला, ही बातमी देशभर पसरली अणि असुरक्षिततेविरुद्ध गदारोळ माजला होता आणि उत्तरेतील जनता कोणत्या भयानक भीतीच्या सावटाखाली रेल्वे प्रवास करते, याचे विदारक चित्र समोर आले. हे चित्र अधिक भेसूर होत आहे; कारण आता ज्यांनी प्रवासाची सुरक्षा करायची त्या रेल्वे पोलिसांनीच होशियार सिंग या तरुणास ट्रेनबाहेर फेकून दिले होते. हा तरुण गाडीखाली येऊन जागीच मृत्यू पावला.
आता डोंबिवलीत पर्स लांबवणा-या चोरटयांचा पाठलाग करताना लोकल ट्रेनच्या धडकेत प्राजक्ता गुप्ता ही १९ वर्षीय तरुणी मृत्युमुखी पडली. चालत्या लोकलमधून महिलांना टोमणे मारणे वा अश्लील शेरेबाजी करणे असे अनेक प्रकार नेहमीच घडत असतात. त्यामुळे रेल्वेत महिला प्रवाशांची सुरक्षा मात्र कोठेच दिसत नसल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.
हे केंद्रीय रेल्वेमंत्री आणि रेल्वे प्रशासन अधिकारीवर्गाने लक्षात घेतले पाहिजे; कारण ही जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यांनी प्रत्येक रेल्वेच्या महिला डब्यात महिला पोलीस सुरक्षा आणि प्लॅटफॉर्मवर एक पोलीस सुरक्षारक्षक रात्री शेवटच्या लोकलपर्यंत ठेवले पाहिजेत. त्यासाठी सुरक्षा भरती वाढवली पाहिजे. तरच गुन्हेगारी व महिला प्रवाशांवरील अत्याचार रोखण्यास मदत होईल. नाही तर रक्षक झाले भक्षक असे होईल, असे मला वाटते.
– प्रवीण पाटील, परळ, भोईवाडा
प्रवासी आभार मानतील
रेल्वेने आपल्या नियोजित वेळा पाळल्या तर निदान सकाळी नोकरी/ व्यवसायानिमित्ताने रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी, शाळेत जाणारे विद्यार्थी यांना वेळेवर पोहोचता येईल. शिवाय सायंकाळी हेच प्रवासी आपल्या घरी परतीचा प्रवासही वेळेवर करू शकले तर त्यांचा रेल्वे प्रवास निश्चितच सुरक्षित होईल.
जर गाडया वेळेवर धावल्या तर खचाखच भरून जाणा-या गाडया, दरवाजात जीव टांगणीला लावून लटकणारे, टपावरून प्रवास करणारे, ढकलाढकली करून काहीही करून डब्यात प्रवेश मिळविण्यासाठी धडपडणारे प्रवासी या प्रवासात प्लॅटफॉर्मवर पडून अपघातग्रस्त होणार नाहीत आणि या तुडुंब गर्दीत पाकीटमारांकडून लुटून जाणारे हे सर्व प्रकार बहुतांशी प्रमाणात टळले जाऊन रेल्वे प्रवाशांचा प्रवास काही प्रमाणात तरी सुखकारक होईल.
याच्या जोडीला रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास कार्यरत राहिले, महिलांच्या पर्स, मोबाईल मारणा-यांच्या विशिष्ट जागांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आणि या चोरटयांना कायमचा धडा शिकविण्यासाठी कठोर मेहनत घेतली, महिलांच्या डब्यातीतल सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या तर महिलाही रेल्वेला धन्यवाद देतील.
– प्रमोद कडू, पनवेल
रेल्वेने प्रामाणिक प्रयत्न करावेत
रेल्वेमध्ये रोज काही ना काही दुर्घटना घडतच आहेत. महिला प्रवासीची पर्स चोरटयांनी पळवली त्या महिलेने धावत्या गाडीतून उडी टाकून चोरटयाचा पाठलाग केला. यावेळी समोरून येणा-या गाडीच्या धडकेने तिचा अंत झाला. महिलांच्या डब्यात सतत रेल्वे पोलिसांचे संरक्षण असते, मग ही गोष्ट कोणाच्याच लक्षात कशी आली नाही. आधीच रेल्वेत महिलांवर सतत अत्याचार होतच असतात.
अच्छे दिनचा नारा देणा-यांनाही अजूनही यावर उपाय सापडलेला नाही. रेल्वेतील गुन्हेगारी वाढण्यास रेल्वेच जबाबदार आहे. चोरटयांची वेगवेगळ्या प्रकारची छायाचित्रे लावून त्यांची ओळख सर्व प्रवाशांना करून देणे गरजेचे आहे. रेल्वेला आपल्या चुका सुधारण्यात जराही स्वारस्थ नाही. रेल्वेला माहिती आहे, की प्रवाशांना रेल्वे हाच महत्त्वपूर्ण पर्याय आहे. त्यातही आपल्या या गलथानपणाला भ्रष्टाचार हा खरा कारणीभूत आहे. रेल्वेतील चोरटयांचा बंदोबस्त करायचे ठरवले, तर रेल्वेला अवघड नाही, पण तशी त्यांची मानसिकताच दिसून येत नाही.
– शंकर पानसरे, काळाचौकी
योग्य नियोजनाची गरज
आजच्या मुंबईच्या धकाधकीत प्रवासी घराबाहेर पडले की कधी एकदा ऑफिस गाठतोय असं होतं आणि ऑफिसबाहेर पडले की कधी एकदा घरी जातो असं होतं. या धावपळीच्या वेळी आपलं लक्ष आजूबाजूला कधीच नसतं. फक्त घर किंवा ऑफिस गाठणे हेच आपलं उद्दिष्ट असतं. अशा घाईगडबडीमध्ये बॅग हिसकावून पळणे, धावत्या ट्रेनमधून गळ्यातली चैन खेचणे किंवा कानाला लावलेला मोबाईल हिसकावणे असे बरेच प्रकार घडताना दिसत आहेत. यासाठी योग्य त्या नियोजनाची गरज प्रवाशांना आहे, सरकारने त्याकडे वेळीच लक्ष देऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घातला पाहिजे.
– वैभव सावंत, कुर्ला
वाढत्या गुन्हेगारीला रेल्वे प्रशासन जबाबदार
रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबद्दलचा दावा करण्यात येतो. मात्र हद्दीतील वाढती गुन्हेगारी पाहता तो दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे. नुकतीच मध्य रेल्वेवर एका महिलेची बॅग पळवल्याची घटना घडली. यावेळी चोराला पकडण्यासाठी त्या महिलेने त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिचा दुस-या ट्रेनला धडकून मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार कोण असेल. अर्थात या गुन्ह्याला प्रशासनच जबाबदार आहे.
– मयूर केणी, वर्सोवा
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातात वाढ
रेल्वेमध्ये चोरी, महिलांवरील अत्याचार यांसारख्या गुन्ह्यांत वाढ झालेली दिसून येतच आहे. मात्र सध्या अपघातांच्या प्रमाणातसुद्धा वाढ होत आहे आणि याला रेल्वे प्रशासनच जबाबदार आहे. बहुतेक अपघात हे रेल्वे आणि प्लॅटफॉर्म यांमध्ये असणा-या मोठया अंतरामुळे घडत असतात.
एकदा मी पाहिलेली घटना आहे. १० ते १२ वर्षाची मुलगी ट्रेनमध्ये चढत असताना तिचा गर्दीमुळे आईने धरलेला हात नकळत सुटला आणि ती मुलगी ट्रेनमध्ये चढता चढता प्लॅटफॉर्मच्या कमी उंचीमुळे अलगद ट्रॅकवर पडली. रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेचा किंवा रेल्वेच्या संबंधित गोष्टींचा प्रशासनाने बारकाईने विचार केला पाहिजे.
– विजया देशमुख, बोरिवली
महिला भयभीतच, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष
सध्या मुंबईकडे असुरक्षिततेच्या नजरेने पाहिले जाते. महिलांवरील अत्याचार आणि चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढतच आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी मध्यंतरी निर्भया हेल्पलाईन नंबर महिलांना देण्यात आला होता. शिवाय रेल्वेने प्रवास करणा-या महिलांना पोलिसांचा व्हॉट्सअॅप नंबरसुद्धा दिला होता आणि प्लॅटफॉर्मवर, रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमरे देखील लावण्यात आले, जेणेकरून महिलांवरील हल्ले, अत्याचार, चोरी रोखली जावी.
महिलांची प्रशासन काळजी घेत आहे हेच यातून दाखविण्यात आले. मात्र मागील सहा महिन्यांत मध्य रेल्वेवर चोरटयांनी केलेल्या हल्ल्यात दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. याची जबाबदारी रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासन घेणार का? हा प्रश्नच आहे.
– प्रदीप गोसावी, ठाणे
सहप्रवाशांनी काळजी घ्यावी
रेल्वेने सुरक्षिततेचा दावा केला तरी दिवसागणिक वाढणा-या चो-यांचे प्रमाण रेल्वेच्या खोटारडेपणाचं पितळ उघडं करतं तेव्हा ते मूग गिळून गप्प बसतात. रेल्वे प्रवासी संख्येच्या प्रमाणात रेल्वे पोलीस बल अर्थात मनुष्यबळ खूपच तुटपुंजं ठरतं, ज्यांना प्रवाशांच्या संरक्षणासाठी विशेषत: महिलांसाठी जेव्हा केव्हा आणीबाणी प्रसंगी आवश्यकता असते तेव्हा हेच सुरक्षारक्षक गप्पांचा फड रंगवून मजा घेत असतात.
याचाच गैरफायदा गुंड, मवाली, दारूडे, गर्दुल्ले नेहमीच घेतात व रेल्वे प्रवाशांमध्ये दहशत निर्माण करतात. रेल्वे हद्दीत होणा-या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने मनुष्यबळ वाढविण्याबरोबरच ४०-५० मीटरवर सीसीटीव्ही लावणे जरुरीचे वाटते. तसेच रेल्वे पोलीस दलानेही प्रामाणिकपणे चोख काम करावे. रेल्वे पोलिसांनी त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं जसं आवश्यक आहे, तसेच आपणही रेल्वे हद्दीत एखाद्या प्रवाशाला वेळप्रसंगी मदत हवी असेल तर सर्वानी एकत्र येऊन सहाय्य करावे.
– दिलीप अक्षेकर, माहीम
मनुष्यबळाचा वापर हवा
प्रवाशांनी कितीही आक्रोश केला तरीही रेल्वे प्रशासनाला काहीही फरक पडत नाही. बेस्टप्रमाणे प्रवाशांच्या तक्रारींना उत्तरे देण्यासाठी जनसंपर्क अधिकारी आहेत की नाही याचाही कधी उलगडा झालेला नाही. रेल्वेकडे मनुष्यबळ असूनही फलाटावर त्यांची उपस्थिती क्वचितच जाणवते.
त्यामुळे महिलांवर शेरेबाजी करणे, पर्स उडविणे, मानसिक त्रास होईल असे प्रकार घडताना दिसतात. अपघात किंवा एखादा गुन्हा घडला तरी कूर्मगतीने कार्यभाग उरकला जातो. त्यामुळे प्रसंगी अपघातग्रस्ताला प्राणास मुकावे लागते. परंतु रेल्वे पोलिसांना माणुसकीचा पाझर फुटत नाही.
– नरेश नाकती, बोरिवली
‘ई-मेल’द्वारा आलेली पत्रे..
पोलिसांची संख्या वाढवा
आम्हाला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी आहे हे दाखवण्यासाठी का होईना पण रेल्वे खाते मध्ये मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत बोलत असते, पण रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टीने काही सुधारणा केली आहे असे मुळीच म्हणता येणार नाही.
रेल्वे प्रवासादरम्यान बॅग चोरणा-या चोराचा पाठलाग करताना समोरून येणा-या रेल्वेची धडक लागून एक महिला प्रवासी आपला जीव गमावते ही रेल्वेची सुरक्षितता? महिलांच्या डब्यातील सुरक्षा रक्षक कुठे गेले होते? यावेळी अधिका-यांनी हलगर्जीपणा केला असेल, तर त्यांच्यावर काय कारवाई झाली हे उपनगरी रेल्वे प्रवाशांना कळायला हवे. एखादी गंभीर घटना घडल्यावर त्यावर तात्पुरते अश्रू ढाळणे ही आपली परंपरा आहे. सकाळ, संध्याकाळी ऐन गर्दीच्यावेळी कावलेले कितीतरी प्रवाशी एकमेकांशी वादावादी करतात. हमरीतुमरीवर येतात.
महिला प्रवाशांमध्येही हे घडताना दिसते. प्रसारमाध्यमांतून हे बघतो, वाचतो; पण अशा विषयांची चर्चा करण्याखेरीज वेगळे काय होते? रेल्वेच्या हद्दीतही गुन्हेगारी वाढते आहे, जर ती रोखायची असेल तर मनुष्यबळाचा अभाव ही तकलादू सबब काय कामाची? पुरेशा प्रमाणात भरती व्हायला हवी.
– मुरलीधर धंबा, डोंबिवली
संबंधितांना तुरुंगाची हवा खायला पाठवा
मध्य लोहमार्गावरील लहान-मोठया भयानक अपघातांना आता काही मर्यादाच उरलेली नाही. भीषण अपघातात कित्येक निरपराध प्रवाशांचा जो नाहक मृत्यू होतो त्याला निर्विवादपणे लोहमार्ग प्रशासनाचा बेजबाबदारपणाच प्रामुख्याने दिसून येतो. लोहमार्ग प्रशासनाच्या ढिसाळ, अनियमित, अनियंत्रित कारभारामुळेच हातपाय तुटणे, अपंगत्व प्राप्त होणे, तीव्र मानसिक धक्का बसणे आदी हालअपेष्टांचा जबरदस्त फटका हा अंतिमत: बसतो.
सहसंवेदनशीलतेचा व शिस्तबद्ध कारभाराचा या अधिका-यांकडे लवलेशही नाही. मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना लाख दोन लाखांची रक्कम फेकली व गंभीर जखमी झालेल्यांना पन्नास हजार दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे समजणा-या या उच्चपदस्थ संबंधित अधिका-यांना या सर्व गैरकारभाराबद्दल जबाबदार धरून जबरदस्त दंडासह तुरुंगाची हवा खायला पाठविल्याशिवाय या चिंताजनक परिस्थितीत काडीचाही फरक पडणार नाही.
– मधुकर ताटके, गोरेगाव
प्रवाशांनी स्वत:च स्वसंरक्षक बनावे
रेल्वेमधून प्रवास करताना अलीकडे होणा-या चो-या, महिला अत्याचार, गुन्हेगारी यांसारख्या घटना पाहता आता रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. पूर्वी रात्रीच्या वेळेस अपवादात्मक घडणा-या घटना पाहता, आता राजरोस या घटना घडत आहेत. या सर्वाला रेल्वे प्रशासन जबाबदार ठरते.
खरे पाहता लांब पल्ल्याच्या गाडया असो, अथवा मुंबईच्या लोकल्स असो संपूर्ण भारतीय रेल्वेला आता पोलीस संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. रेल्वेतून प्रवास करताना, आपल्या शेजारील व्यक्ती असो, किंवा दुस-या डब्यातील कोणीही व्यक्ती त्यांच्यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे. शेजारील व्यक्ती ही गोड बोलून आपली बॅग अथवा इतर कोणतीही वस्तू घेऊन केव्हा पलायन करेल याचा ऊहापोह न होणेच बरे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा दावा रेल्वे प्रशासनाकडून वळोवेळी करण्यात येतो, परंतु याची ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही.
– ओंकार विलणकर, प्रभादेवी
सुरक्षेकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे
आपल्या देशाची वाढती लोकसंख्या पाहता रेल्वे प्रशासनाला कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणणे म्हणजे पूर्णत: तारेवरची कसरत करावी लागते. कारण रेल्वे प्रवासात घडणा-या गंभीर गुन्ह्यांवर आळा घालणे रेल्वे प्रशासनाला डोईजड झालेले आहे. रेल्वे प्रवाशांना प्रवास करताना चोरी, छेडछाड, बलात्कार, रेल्वे डब्यातून ढकलून देणे किंवा वादावादी करून मारहाण करणे असे गुन्हे सध्या खूप घडत आहेत. कारण आज रेल्वे प्रशासनाचे सुरक्षिततेबाबत कामकाज अगदी ढसाळ व निद्रा अवस्थेमधले आहे.
रेल्वे प्रशासनाकडे मनुष्यबळाचा अभाव दिसून येतो. रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था रेल्वे प्रशासनाच्या कारभारात सध्या दिसून येते. प्रवाशांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सुरक्षेबाबत चांगल्या व कडक उपाययोजना राबविल्या पाहिजेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर व रेल्वे डब्यात सीसी कॅमेरे बसविणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांच्या डब्याचे दरवाजे मेट्रो रेल्वेच्या डब्याप्रमाणे बनविण्यात यावे जेणेकरून रेल्वे अपघातावर निर्बंध येईल.
सुरक्षिततेसाठी मनुष्यबळाची भरती करावी, केंद्र सरकारने रेल्वेच्या चांगल्या सुविधांसाठी जास्त महसूल खर्च करावा, राज्यात स्मार्ट सिटी बनविण्यापेक्षा महिलाच्या सुरक्षिततेचा गंभीरतेने विचार करावा, रेल्वेची कायदा व सुव्यवस्था कडक करून गुन्हेगारांचा निकाल फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून कठोर शिक्षा करावी.
न्यायालयांवर सर्व नागरिकांनी विश्वास ठेऊन पोलीस व न्यायालयाला एक नागरिक या नात्याने रेल्वे गुन्हेगाराला जेरबंद करण्यास मदत करावी, ही आपली जबाबदारी आहे. महिलांच्या रेल्वे डब्यात दिवस ते रात्री शेवटच्या ट्रेनपर्यंत पोलीस ठेवावेत.
रेल्वे डब्यात रोज चालणारा सट्टा-जुगार तसेच बाजारी भाषण बंद करा. रेल्वे प्रशासनाने पुरुष व महिला डब्यात दिवस-रात्र सिव्हिल पोलीस ठेवणे गरजेचे आहे. अशा गोष्टी गंभीरतेणे पाळल्यास रेल्वेमध्ये घडणा-या गुन्हय़ांवर आळा बसण्यास वेळ लागणार नाही.
– राजेंद्र सावंत, टिटवाळा
आरपीएफ व रेल्वे पोलिसांत ताळमेळचा अभाव
रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहे. रेल्वे हद्दीतील या वाढत्या गुन्हेगारीचा विचार करताना सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रेल्वेची मालमत्ता व प्रवाशांची सुरक्षा पाहण्याची जबाबदारी केंद्र शासनाच्या अख्यतारित असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाची म्हणजे आरपीएफची आहे. तर रेल्वे पोलीस हे राज्य शासनाचे असून त्यांच्यावर प्रामुख्याने एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याचा तपास करण्याचे काम आहे.
मात्र या दोन भिन्न सुरक्षा यंत्रणांचा आपापसात ताळमेळ नसून अनेक मुद्दय़ांवरून त्यांच्यामध्ये सतत वादविवाद चालू असतात. जसे गुन्हा घडल्यावर हद्दीचा वाद, सीसीटीव्ही लावण्यावरून वाद, श्रेष्ठत्वाची भावना, छोटयामोठया गोष्टीवरून प्रतिष्ठेचा प्रश्न करणे, तसेच दोघांमधील अधिकारांमध्ये असलेली तफावत इत्यादी. दोन्ही दलांतील या समन्वयाच्या अभावामुळे रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. गुन्हेगार या सर्व परिस्थितीचा नेमका फायदा उठवत आहेत. रेल्वेतील प्रवाशांना मुख्यत्वे भुरटया चोरांचा त्रास सहन करावा लागतो.
पाकीटमारी, सोनसाखळ्या खेचणे, बॅगा हिसकावणे, महिलांच्या हातातील मोबाईल फोन, लॅपटॉप, पर्स खेचणे अशा घटना वाढल्या आहेत. एखाद्या महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलाच तर तिचा जीव धोक्यात पडतो. अगदी प्रसंगी जीवही जातो. याला पूर्णत: उपरोक्त रेल्वे सुरक्षा यंत्रणाच जबाबदार आहे. रेल्वेचा एकूण आवाका पाहता रेल्वेतील अंतर्गत गुन्हेगारी रोखण्यास पोलीस यंत्रणेचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे.
महिला प्रवाशांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक डब्यात सशस्त्र पोलीस तैनात करणे, सीसीटीव्ही लावणे, सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रवासी संघटनांची मदत घेणे इत्यादी उपाय करणे गरजेचे आहे. तसेच रेल्वे हद्दीत प्रवाशांची लूट होत असताना सहप्रवाशाने मदतीसाठी धावलेच पाहिजे. जर रेल्वे प्रशासनाने उपलब्ध पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने रेल्वे हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी निर्धारपूर्वक कडक पावले उचलली तर रेल्वे प्रवाशांचा प्रवास ख-या अर्थाने सुरक्षित आणि सुखकर होईल.
– प्रदीप शंकर मोरे, अंधेरी
रेल्वे सुरक्षेचे ऑडिट होणे गरजेचे
रेल्वे लोकल व रेल्वे स्थानकातील वाढती गुन्हेगारी हा आज मोठा गंभीर प्रश्न आहे. रेल्वे प्रशासनाचा सुरक्षेचा दावा वेळोवेळी फोल ठरत असताना, प्रवाशांच्या सुरक्षेची हमी कोण देणार? वाढत्या दहशतवादी कारवाया, रेल्वेतील गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे दिसते. त्यामुळे रेल्वे सुरक्षेचे ऑडिट होणे गरजेचे आहे.
या ऑडिटमुळे रेल्वे प्रशासनातील सुरक्षेबाबतच्या त्रुटी दूर होण्यास मदत होईल आणि याकरिता रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. कारण आज रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षेसंदर्भातील सर्व उपाययोजना अमलात आणून रेल्वेतील सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा होऊ शकते. तसेच प्रवाशांनीही त्यांच्या व रेल्वेच्या सुरक्षेकरिता सजग राहण्याची गरज आहे.
– उदय वाघवणकर, जोगेश्वरी
रेल्वेतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक
रेल्वेतील गुन्हेगारी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहे. उपनगरीय रेल्वेगाडय़ांतून प्रवास करणा-या महिला प्रवाशांना भुरटया चोरांनी लक्ष्य केले असून, यामुळे रेल्वे अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. रेल्वेत महाराष्ट्र पोलिसांचे रेल्वे पोलीस व रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बल या दोघांवरही प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे.
मात्र, ही दोन्ही दले गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरली आहेत. चोरटय़ांशी या दोन्ही दलांचे लागेबांधे असल्यामुळेच हप्तेखोरीत लडबडलेल्या या पोलिसांचे कारवाईपेक्षा जास्त लक्ष पैसे ओरबाडण्यातच असते. गुन्हेगारांचा वावर हा रेल्वेमध्ये वाढला असून, त्याला आळा घालणारे पोलीसच त्यांचे मित्र बनल्यामुळे सामान्यांचा प्रवास खडतर झाला आहे. रेल्वेत चोरटय़ांशी व अवैध धंदेवाल्यांशी असलेली पोलिसांची व आरपीएफ यांची साखळी मोडल्याशिवाय या घटना रोखणे अवघड आहे.
या दोन्ही दलांमध्ये कोणताही संवाद नसल्याने त्यांची नेमकी कामे कोणती व जबाबदारी कोणती ही गोष्ट सामान्य माणासाला समजण्यापलीकडे आहे. तरीही गुन्हेगारांना अटकाव करण्यासाठी रेल्वे पोलिसांना आणखी मनुष्यबळाची गरज आहे. रेल्वे प्रवासी संघटनांची मदत घेण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला पाहिजे.रेल्वेतील प्रवासीसंख्येत रोज होणारी वाढ याच गर्दीचा फायदा गुन्हेगारांना मिळतो. रेल्वे स्थानक परिसरातील अपघात आणि गुन्हे घटण्यासाठी पोलिसांबरोबरच प्रवासी संघटनांनी जागरूकपणे मदत करण्याची गरज आहे.
– विवेक तवटे, कळवा.
रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वा-यावर
रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेवर विश्वास ठेवून प्रवासी बिनधोक प्रवास करतो. मात्र, आता तसे राहिले नाही. अनेक वेळा सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महिला प्रवाशांची चोरटयाने बॅग पळवली म्हणून चोराचा पाठलाग करीत असताना, तिला लोकलची धडक बसून प्राण गमवावा लागला. हेच कडक सुरक्षाव्यवस्था असती, तर घडले नसते. रेल्वे हद्दीत चोर येतातच कसे? सराईत पाकीटमार, चोर, लुटारू यांची माहिती पोलिसांना असते. रेल्वे हद्दीत कोणी प्रवेश करावा याचे काही नियम नाहीत.
एअरपोर्टवर जेवढी कडक सुरक्षा असते तेवढी सुरक्षा व्यवस्था रेल्वे स्थानकात हवी. रेल्वे प्रवाशांची संख्या प्रतिदिन ७० लाखाहून अधिक आहे. मात्र गृहरक्षक दलाचे जवान, रेल्वे सुरक्षा रक्षक, रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस एवढा फौजफाटा असतानाही, पाकीटमारी, बॅग चोरी इत्यादी घटना घडतात. अखेर, रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वा-यावर, असेच म्हणावे लागेल.
– महादेव गोळवसकर, घाटकोपर
टॅब खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची चर्चा असून विद्यार्थ्यांना टॅबचा खरोखरच लाभ होईल का?
विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचे आेझे कमी करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेतला. मात्र खरेदी केलेल्या टॅबमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महापालिका विरोधी पक्षांकडून करण्यात येतो तो योग्य वाटतो का? व्हीडिऑकॉन कंपनीचे कालबाझालेले टॅब खरेदी करण्यासाठी त्या कंपनीशी संलग्न असलेल्या टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीला कंत्राट देण्याबाबत मातोश्रीवर बैठका झाल्या आणि त्यांच्या इशा-यावरूनच हे कंत्राट दिल्याचा जो काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी आरोप केला तो योग्य वाटतोय का, किंबहुना शाळांमधील सर्व पायाभूत सुविधा आणि इतर वस्तू न देता आवश्यक नसलेले टॅब देणे हा एक प्रकारे वायफळ खर्च वाटतो काय? कालबाटॅब दिल्यास त्याचा खरोखरच उपयोग विद्यार्थ्यांना होईल का? एकूणच शिवसेना आणि भाजपाने स्वत:ची झोळी भरून घेण्यासाठी या टॅबचा अट्टाहास धरलेला असून यामुळे खरोखरच विद्यार्थ्यांचा पाठीवरचे ओझे कमी होऊन शिक्षणाचा दर्जा वाढेल असे तुम्हाला वाटते का? की यासाठी वेगळ्या प्रकारे काही नियोजन करण्याची गरज आहे?
वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
प्रहार कार्यालय,
वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड, लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-६१२३९९००. ०२२- ६१२३९९६६
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन
आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in