लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये जागा उपलब्ध नसतानाही रेल्वेकडून देण्यात येणारे प्रतीक्षा यादीचे तिकीट १ जुलैपासून रद्द होणार आहे.
नवी दिल्ली- लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये जागा उपलब्ध नसतानाही रेल्वेकडून देण्यात येणारे प्रतीक्षा यादीचे तिकीट १ जुलैपासून रद्द होणार आहे. प्रत्येक प्रवाशांना प्रवासाचे कन्फर्म व आरएसी तिकीट देण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटासंदर्भातील अनेक गैरव्यवहारांना आळा बसणार आहे. याचा मोठा फायदा कोटय़वधी प्रवाशांना होणार आहे.
रेल्वेने प्रवाशांच्या फायद्याने अनेक नियम केले असून त्याची अंमलबजावणी १ जुलैपासून होणार आहे. सध्या प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाडीत आरक्षण संपल्यानंतर प्रतीक्षा यादीवरील तिकीट दिले जाते. रेल्वेने ही यादीत रद्द करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म तिकीट देण्यात येईल. यामुळे प्रतीक्षायादीवरील तिकीट कन्फर्म करण्यासाठी करण्यात येणा-या अनेक लटपटींना आळा बसणार आहे.
तत्काळ तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना ५० टक्के रक्कम पुन्हा मिळणार आहे. त्याचबरोबर तात्काळ बुकिंगची वेळ वातानुकूलित वर्गासाठी सकाळी १० ते ११ वाजता तर शयनयान कक्षासाठी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत असेल. राजधानी व शताब्दी एक्स्प्रेसच्या डब्यात वाढ करण्यात येणार आहे. या गाडय़ांचे कागदी तिकीट बंद केले असून मोबाईल तिकीट वैध असेल. त्याचबरोबर नवीन सुविधा एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रेल्वेचे तिकीट इंग्रजी, हिंदीबरोबरच अन्य प्रादेशिक भाषांमध्येही मिळणार आहे, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
रेल्वेने प्रीमियम रेल्वे ही श्रेणी रद्द केली आहे. तसेच सुविधा रेल्वेचे तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना निम्मा परतावा मिळणार आहे. तसेच वातानुकूलित-२चे तिकीट रद्द करायला १०० रुपये, वातानुकूलित-३ चे तिकीट रद्द करायला ९० रुपये तर शयनयान कक्षाचे तिकीट रद्द करायला ६० रुपये शुल्क आकारले जाईल.
त्याचबरोबर प्रवासात इच्छित स्टेशन येण्यापूर्वी रेल्वे तुम्हाला ‘वेकअप’ कॉल देईल. यासाठी १३९ क्रमांकावर फोन करून प्रवाशांना ‘वेकअप कॉल डेस्टिनेशन’ची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर प्रवाशाला रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी एक तास आधी ‘वेककॉल’ देऊ उठवले जाईल.
दरम्यान, राजधानी, शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी जेवण ऐच्छिक केले आहे. यापूर्वी प्रवाशांना जेवण नको असले तरी ते पैसे भरावे लागत होते. जेवण नको असल्यास तिकिटाचे पैसे कमी होतील. त्याचबरोबर लहान मुलांसाठी ‘बेबी फूड’ची सुविधा रेल्वे स्थानकांवर ठेवली जाईल. त्यात गरम दूध, पाणी आदींचा समावेश असेल. मुंबई सेंट्रल, पुणे, नागपूरसह २५ स्थानकांवर ही सुविधा दिली जाईल.