सरकारी उपक्रमांमधील रेल्वेमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
नवी दिल्ली- सरकारी उपक्रमांमधील रेल्वेमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याची माहिती पुढे आली आहे. रेल्वेतील कर्मचा-यांच्या विरोधात २०११मध्ये भ्रष्टाचाराच्या तब्बल नऊ हजार तक्रारी केंद्रीय दक्षता आयोगाकडे करण्यात आल्या आहेत.
दक्षता आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालामधून ही गोष्ट समोर आली आहे. २०११मध्ये रेल्वेतील कर्मचा-यांच्या विरोधात तब्बल आठ हजार ८०५ तक्रारी आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल बँकेतील कर्मचा-यांच्या विरोधात आठ हजार ४०३ तक्रारी दाखल करण्या आल्याचे आयोगाने अहवालात म्हटले आहे. तर आयकर विभागातील कर्मचा-यांच्या विरोधात पाच हजार २६ तक्रारी दक्षता आयोगाकडे आल्या आहेत.
राजधानी दिल्लीत सरकारी कर्मचा-यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या चार हजार ७८३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर नागरी विकास मंत्रालयातील तीन हजार ९२१ कर्मचा-यांच्या विरोधात २०११मध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.
दक्षता आयोगाच्या अहवालानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील दोन हजार ९६०, दूरसंपर्क मंत्रालयातील एक हजार ९१८, पेट्रोलियम मंत्रालयातील एक हजार ८७७, अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयातील एक हजार ५४४ तर उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क विभागातील एक हजार २९६ कर्मचा-यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.