महागाईने त्रासलेल्यांना रेल्वे भाडेवाढीतून सुटका करण्याचे आव्हान केंद्राच्या नव्या सरकारपुढे आहे.
मुंबई – महागाईने त्रासलेल्यांना रेल्वे भाडेवाढीतून सुटका करण्याचे आव्हान केंद्राच्या नव्या सरकारपुढे आहे. नव्यानेच सत्तेची धुरा हाती घेण्यास उत्सुक असलेल्या भाजपला सर्वसामान्य नागरिकांबद्दल काही वाटत असेल, तर २० मेपासून होणारी रेल्वेची भाडेवाढ रोखावी, असे आवाहन रेल्वे प्रवासी संघटनांनी केले आहे.
[poll id=”654″]
१६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि भाजपला एकहाती सत्ता मिळाली. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या खिशात हात टाकत तिकीट व पास दरवाढीच्या माध्यमातून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. वर्षभरात दोन वेळा दरवाढ करत प्रवाशांचा प्रवास अधिक खडतर करण्यात आला आहे. त्यातच २० मेपासून नव्याने दरवाढ करत प्रवाशांच्या खिशाला चाट लावण्याचे काम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी महागाई कमी करण्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. आता सत्ता भाजपच्या हाती आली आहे. त्यामुळे प्रवाशांचा विचार करत २० मेपासून होणारी दरवाढ रोखावी आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केली आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा दिल्या जात असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जातो. मात्र वेळोवेळी भाडेवाढ करत प्रवाशांची लूट केली जात आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी व प्रवासी संघटनांच्या रोषाला रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा यात्री प्रवासी संघटनचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी दिला आहे. रेल्वेची दरवाढ झाली की, ती शक्यतो कमी करण्यात कोणीही पुढाकार घेत नाही. मात्र दरवाढीच्या माध्यमातून प्रवाशांवर अन्याय केला जात आहे. रेल्वे दरवाढीचा लोकशाही पद्धतीने विरोध करण्यात येईल, असे कोटियन यांनी सांगितले.