भारतात १८५३ साली मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. ब्रिटिशांनी त्यांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या साम्राज्य वाढीच्या दृष्टीने भारतात रेल्वेचा पाया रचला.
मुंबई प्रतिनिधी- भारतात १८५३ साली मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे धावली. ब्रिटिशांनी त्यांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या साम्राज्य वाढीच्या दृष्टीने भारतात रेल्वेचा पाया रचला. मात्र, अद्यापपर्यंत रेल्वेचा हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी भारतात इतर देशांप्रमाणे कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नव्हती.
युनायटेड आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी याबाबत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, आता रेल्वेच्या या ऐतिहासिक ठेव्याचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचा सरकारचा मानस आहे. यासंबंधी रेल्वेविषयक अभ्यासक, जाणकार आणि माजी वित्त आयुक्त संजय मुखर्जी यांच्यामार्फत प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यात आला आहे.
सत्तरच्या दशकापर्यंत भारतीय रेल्वे प्रशासनाकडे सुमारे ५००० वाफेवर चालणारी इंजिने होती. मात्र, नियोजनाअभावी आणि इतिहासाच्या अनास्थेपायी यातील बहुतेक इंजिनांना भंगारात काढण्यात आले. ब्रिटनने वाफेवर चालणा-या सुमारे एक हजार इंजिनांची चांगल्या प्रकारे देखभाल केली असून ती अद्यापही कार्यरत आहेत. भारतात अशा दहा ‘ब्लॅक ब्यूटीज्’ चालू अवस्थेत आहेत. मागील कित्येक वर्षापासून जगातील सर्वात जुने वाफेवर चालणारे रेल्वे-तिला ‘सिस्टर ऑफ द फेअरी क्वीन’ असेही म्हटले जाते, ते ईआयआर-२१ हे इंजिन पेरांम्बूर येथील रेल्वे वर्कशॉपमध्ये पडून आहे. ज्या काळी वाफेवर चालणा-या रेल्वेगाडय़ा धावत होत्या, त्या काळातील सिग्नल यंत्रणा, दूरध्वनी, घडय़ाळे हे सारे काही नामशेष झाले आहे.
६.५ कोटींचा निधी मंजूर
दहा वर्षापेक्षा अधिक काळानंतर भारतीय रेल्वेने ६.५ कोटी रुपयांचा निधी वाफेवर चालणा-या रेल्वेगाडय़ांच्या संवर्धनासाठी मंजूर केला आहे. ‘रेवरी स्टीम सेंटर’ या ठिकाणी या रेल्वेगाडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच भुसावळ आणि लम्बडिंग या ठिकाणी पडून असलेल्या ‘ब्लॅक ब्यूटीज्’ या रेल्वेगाडय़ांना पुन्हा नवी झळाळी देण्यात येणार आहे. त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष झाले
संवर्धनासाठी आर्थिक मुद्दा हा कळीचा विषय आहे; पण या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही अधिका-यांवर सोपविण्यात आलेली अतिरिक्त जबाबदारी होती. त्यामुळे त्याकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष झाले. यासंबंधी काही अपवाद वगळले तर बहुतेक रेल्वे अधिका-यांना या विषयाचे कमी ज्ञान आहे, अशी कबुली एका रेल्वे अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.