पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या आठवड्याची सुरुवातच अपेक्षेप्रमाणे गदारोळात झाली.
पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या आठवड्याची सुरुवातच अपेक्षेप्रमाणे गदारोळात झाली. विधानसभेचे आमदार प्रवीण दरेकर व विधान परिषदेचे आमदार दिवाकर रावते यांचे निलंबन मागे घेण्यासाठी दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले होते. खरे तर आज अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात चर्चेला येणार होते. विदर्भात पावसाने थैमान घातले असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबद्दलची लक्षवेधी सूचना विधान परिषदेत चर्चेला येणार होती. मात्र विरोधकांच्या ताठर भूमिकेमुळे या महत्त्वाच्या चर्चा होऊ शकल्या नाहीत. सभागृह सुरू असताना चर्चा झाली नसली तरी विधानसभा बंद झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभागृहातच ‘अभिरूप सभागृह’ सुरू केले. तर विधान परिषद विरोधी पक्षांचे सदस्य सभागृहात उपस्थित राहिले मात्र ते आसनावर न त्यांनी जमिनीवर बसकण मारली. खाली बसून त्यांची चर्चा सुरू होती. दोन्ही सभागृहांतील या चर्चा रंगल्या ख-या, मात्र त्या रेकॉर्डवरच आल्या नाहीत.
सभागृहात झालेला प्रत्येक शब्द रेकॉर्ड होतो. मात्र आज यातील काही चर्चा रेकॉर्ड झाल्या नाहीत. विधानसभेत प्रवीण दरेकर यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब झाले. त्यानंतर विरोधकांनी सभागृहातच ठिय्या मांडून प्रति विधानसभा सुरू केली. गिरीश बापट हे विधानसभेचे अध्यक्ष झाले, सुरुवातीला चैनसुख संचेतींना मुख्यमंत्री म्हणून संबोधले जाऊ लागले. मात्र नंतर नाना पटोले हे स्वंयघोषित मुख्यमंत्री झाले. विरोधी पक्षांचे बहुतेक सदस्य विरोधी बाकांवर बसले होते, तर काही सदस्य मंत्र्यांच्या आसनांवर बसले होते. हे अभिरूप सभागृह सुरू होताच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या आसनावर कुणी बसायचे नाही, असा निर्णय विरोधकांनी घेतला होता. इतर मंत्र्यांचे आसन मात्र काही सदस्यांनी पटकावले होते. त्यात नाना पटोले, एकनाथ शिंदे, भरत गोगावले, भाजपचे संजय भेगडे आदी सदस्यांचा समावेश होता. हे सर्व जण मंत्र्यांच्या भूमिकेत बसले असले तरी विरोधी बाकांवरून विचारलेल्या सर्व प्रश्नांना नाना पटोले हे एकटेच उत्तरे देत होते. अभिरूप विधानसभा सुरू करतानाच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी रात्रभर येथेच बसायचे आहे, असे सांगितले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीरपणे या आंदोलनामागील भूमिका विरोधकांना समजावून सांगितली. ते म्हणाले, ‘आपल्याला रात्रभर येथेच बसायचे आहे. त्यासाठी कुणावरही जबदस्ती केली जाणार नाही. मात्र ज्यांना सरकारविरोधात लढायचे आहे, त्या प्रत्येकाने इथेच थांबावे,’ असे आवाहन केले व पुढे अभिरूपची चर्चा सुरू राहिली.
विधान परिषदेत सर्व विरोधी सदस्य जमिनीवर बसले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचनाची चर्चा मंगळवारी सभागृहात घेण्याची तयारी दर्शवली. तसेच रावते यांचे निलंबन मागे घेण्याबाबत आपण सभापतीच्या दालनात बैठक घेऊ, असे सांगितले. मात्र सभागृह तहकूब करून निलंबन मागे घेण्याबद्दल बैठक घ्या, असे विरोधी पक्षनेते विनोद तावडे म्हणाले. त्यावर दादा आपल्या स्टाइलमध्ये ‘सगळं काय तुमचंच ऐकायचं,’ असे म्हणत अजित पवार बाहेर निघून गेले. सभागृहात महत्त्वाचे विषय असल्याने चर्चा व्हावी, अशी विरोधकांची इच्छा होती. मात्र विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी ताठर भूमिका घेतली. मग त्यांना समजावण्यासाठी शिवसेनेचे दीपक सावंत जेथे बसले होते, तिथून उठून तावडे यांच्याकडे गेले व पुढील रणनीती ठरवण्यासाठी चर्चा करू लागले. त्यांची चर्चा बराच वेळ रंगली. मात्र ती रेकॉर्डवर येऊ शकली नाही. एकंदर दोन्ही सभागृहांतील बरीच चर्चा आज रेकॉर्डवरच आली नाही.