नुसत्या शास्त्रपठणामुळे होणा-या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये, नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते; म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. वृत्ती आवरणा-याला भगवंताचे प्रेम असलेच असे सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्म विचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यांवर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे, साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच तेवढे खरे असे तो धरून परमात्मा जर सर्वव्यापी आहे, तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहिजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता, भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व, आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहीत होतो. पण सृष्टीमधल्या विभूतिरुपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही.
– ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज