जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २८ मार्च रोजी घडलेल्या रंजक घडामोडी…
भारताचे सर्वोत्तम माजी फलंदाज आणि कर्णधार पॉली उम्रीगर यांचा जन्म. तिस-या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणा-या मराठमोळया उम्रीगर यांनी ५९ कसोटी सामन्यांत ३६३१ धावा केल्या. त्यात १२ शतकांचा समावेश आहे. प्रभावी ऑफब्रेक मा-याने त्यांनी ३५ विकेट्सही घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारे ते पहिले फलंदाज होते. सुनील गावस्कर यांच्यापूर्वी सर्वाधिक कसोटी सामने, सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके उम्रीगर यांच्या नावावर होती.
१९५१
कसोटी क्रिकेटमधील एक दुर्मिळ गोलंदाजी पाहायला मिळाली. वेलिंग्टनमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत न्यूझीलंडचे लेगस्पिनर अलेक्स मॉइर यांनी चहापानापूर्वीच्या शेवटच्या आणि त्यानंतरच्या पहिल्या अशा दोन्ही षटकांत सलग विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटच्या तीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच अशी करामत एखाद्या गोलंदाजाने केली. त्यापूर्वी १९२१मध्ये ओल्ड ट्रॅफर्डवर ऑस्ट्रेलियाच्या वॉर्विक आर्मस्ट्राँग यांनी अशी गोलंदाजी केली होती.
१९५५
ईडनपार्कमध्ये (ऑकलंड) झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत न्यूझीलंडचा डाव अवघ्या २६ धावांत संपला. किवीजची कसोटीतील ही नीचांकी धावसंख्या ठरली. इंग्लंडच्या बॉब अप्पलीयार्ड (७-४), ब्रायन स्टॅथम (९-३) आणि फ्रँक टायसन (१०-२) यांनी यजमानांना हादरवले.
१९५६
श्रीलंकेचे माजी डावखुरे लेगस्पिनर अशोका डिसिल्वा यांचा जन्म. १० कसोटी सामन्यांत आठ आणि २८ वनडेत १७ विकेट्स घेणा-या डिसिल्वा यांची क्रिकेट कारकीर्द सहा वर्षाचीच होती. निवृत्तीनंतर ते पंचगिरीकडे वळले. सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपसह गेल्या तीन वर्ल्डकपमध्ये आयसीसी एलिट अंपायर म्हणून त्यांनी काम पाहिले.
१९६२
लांस गिब्ज यांच्या (१५.३-१४-६-८) अफलातून स्पेलमुळे बार्बाडोस कसोटीत भारताचा डाव १८७ धावांत आटोपला. दोन बाद १५८ अशा चांगल्या स्थितीत भारत होता. दुस-या डावातही आठ विकेट्स घेत गिब्ज यांनी सामन्यातील विकेट्सची संख्या १६वर नेली. गिब्ज यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने ही कसोटी डावाने जिंकली.
१९६८
इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसेन याचा मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) जन्म. भारतीय वंशाच्या हुसेनने ९६ कसोटी सामन्यांत १४ शतकांसह ५७६४ आणि ८८ वनडेत एका शतकासह २३३२ धावा केल्या. २००४ मध्ये क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता समालोचकाच्या भूमिकेत तो दिसतो.
१९८१
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुस-या दिवशी वेस्ट इंडिजचे माजी आक्रमक फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी ११४ धावांची झंझावाती खेळी केली. या शतकातील ९० धावा चौकारांनी बनल्या होत्या. घरच्या मैदानावर (अँटिग्वा) झालेल्या पहिल्या कसोटीत शतक झळकावण्याचा मान रिचर्ड्स यांनी पटकावला. १९३० नंतर अँटिग्वाच्या रूपाने वेस्ट इंडिजला नवे कसोटी ठिकाण मिळाले.
२००४
मायदेशात झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाकडून ०-३ असे पराभूत व्हावे लागले. तिन्ही सामन्यांतील पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया पिछाडीवर होता. मात्र सर्व सामने जिंकण्यात ते यशस्वी ठरले.
२००५
भारत दौ-यावर आलेला संघ कमकुवत असूनही बंगळूरु कसोटी जिंकून पाकिस्तानने भारताविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. युनुस खान (२६७) बंगळूरुच्या विजयाचा शिल्फकार ठरला. त्याने इंझमाम उल हकसह (१८४) तिस-या विकेटसाठी ३२४ धावांची भागीदारी रचली. वीरेंदर सेहवागच्या द्विशतकानंतरही भारताला आघाडी घेता आली नाही. दुस-या डावातील दनिश कनेरिया आणि मोहंमद सामीच्या भेदक गोलंदाजीमुळे पाकिस्तानने नेत्रदीपक विजय मिळवला.
२००७
श्रीलंकेचा तेज गोलंदाज लसित मलिंगाने पदार्पणातील कसोटीत चार चेंडूंवर चार विकेट्स मिळवण्याची अनोखी कामगिरी केली. तरीही दक्षिण आफ्रिकेने ती कसोटी जिंकली.
२००८
दक्षिण आफ्रिकेचा माजी कसोटीपटू हर्शेल गिब्जला दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल केपटाऊनमध्ये अटक करण्यात आली. वादग्रस्त गिब्जच्या बेशिस्त कारकीर्दीत आणखी एका गुन्हयाची भर पडली.
२०११
पाँटिंगच्या सवरेत्तम नेतृत्वाची अखेर.. ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कर्णधार असा मान मिळवलेल्या रिकी पाँटिंगने नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. यापुढे एक क्रिकेटपटू म्हणून संघात राहू, असे त्याने स्पष्ट केले. पाँटिंगच्या कर्णधारपदाखालील सात वर्षाच्या कालावधीत ऑस्ट्रेलिया क्रिकेटने एक वेगळी उंची गाठली. मात्र हे वर्ष त्याच्यासाठी वाईट गेले. अॅशेस मालिकेतील मायदेशात झालेला पराभव आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतर पाँटिंगच्या नेतृत्वावर टीका झाली. त्याचा उत्तराधिकारी म्हणून मायकेल क्लार्कने सूत्रे स्वीकारली.