जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात २८ जानेवारी रोजी घडलेले रंजक किस्से
ऑस्ट्रेलियाचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार माँटी नोबल यांचा जन्म. उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक किंवा मध्यमगती मारा केलेले नोबल १९०७-०८ आणि १९०९ असा दोन हंगामांमध्ये अॅशेसविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार होते. ४२ कसोटी सामन्यांमध्ये जवळपास दोन हजार धावा आणि सव्वाशेच्या आसपास बळी घेऊन नोबल यांनी चमक दाखवली होती. त्यांच्या नावाने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर एक स्टँड आहे.
१८८७
इंग्लंडची त्यांच्या कसोटी इतिहासातील नीचांकी धावसंख्या. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर या दिवशी चार्ली टर्नर (१५ धावांत सहा विकेट्स) आणि जेजे फेरिस (२७ धावांत चार विकेट्स) या दोनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मिळून इंग्लंडचा ४५ धावांत खुर्दा उडवला. केवळ एकाच फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली. या सामन्याच्या आधी काही वेळ एक डोमेस्टिक सामनाही सुरू होता. एकाच दिवशी एकाच मैदानावर दोन प्रथम श्रेणी सामने खेळवले जाण्याचीही ही क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच आणि एकमेव वेळ. इतके सगळे होऊनही इंग्लंडने तो सामना जिंकला, हे विशेष!
१८८०
इंग्लंडचे माजी यष्टिरक्षक हर्बट स्टड्रविक यांचा जन्म. ते २८ कसोटी सामने खेळले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये यष्टींमागे सर्वाधिक बळींचा विक्रम अनेक वर्षे त्यांच्याच नावावर होता.
१९४९
सलग पाच डावांमध्ये शतके झळकवल्यानंतर वेस्ट इंडिजचे फलंदाज एव्हर्टन वीक्स सलग सहाव्या शतकाच्या अगदी समीप पोहोचले होते. पण मद्रासला या दिवशी ९०वर धावचीत झाले! दुस-या डावातही त्यांनी ५६ धावा केल्या. सलग सात अर्धशतकांच्या त्यांच्या विक्रमाशी पुढे झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर आणि वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंदरपॉल यांनी बरोबरी केली.
१९६०
एखाद्या सामन्यात पाचही दिवस फलंदाजी करणारे एमएल जयसिंहा कसोटी क्रिकेटमधील असे पहिले फलंदाज बनले. कलकत्ता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते पहिल्या दिवशी नवव्या क्रमांकावर खेळायला आले आणि नाबाद राहिले. दुस-या दिवशी ते २० धावांवर नाबाद राहिले. तिस-या दिवसाच्या अखेरीस ते ‘नाइट वॉचमन’ म्हणून खेळायला उतरले. चौथ्या दिवशी दिवसभर खेळून त्यांनी नाबाद ५९ धावा केल्या. पाचव्या दिवशी ७४ धावांवर ते अखेर बाद झाले. जयसिंहा यांच्यानंतर जेफ्री बॉयकॉट, किम ह्यूज, अॅलन लँब, रवी शास्त्री, एड्रियन ग्रिफिथ, अँड्रय़ू फ्लिंटॉफ यांनी कसोटी सामन्याचे पाचही दिवस फलंदाजी केलेली आहे.
१९७६
ऑफस्पिनर इरापल्ली प्रसन्ना यांनी न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड कसोटीच्या दुस-या डावात ७६ धावांमध्ये आठ विकेट्स घेतल्या. एखाद्या भारतीय गोलंदाजाची न्यूझीलंडमधील ही सर्वोत्तम कामगिरी. भारताने तो सामना आठ विकेट्सनी जिंकला. याच दिवशी प्रसन्ना यांनी विनू मांकड यांचा १६२ कसोटी बळींचा विक्रम मागे टाकला आणि ते भारताचे सर्वाधिक यशस्वी फिरकी गोलंदाज बनले. पुढे भागवत चंद्रशेखर, बिशनसिंग बेदी, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी त्यांना मागे सोडले.
१९८९, १९९१, १९९२
तीन दिवस एकत्र देण्याचे कारण म्हणजे, या तिन्ही दिवशी डेव्हिड बूनने शतके झळकवली! प्रथम वेस्ट इंडिजविरुद्ध सिडनीला, दुस-यांदा इंग्लंडविरुद्ध अॅडलेडला आणि तिस-यांदा अॅडलेडलाच भारताविरुद्ध.. ही त्याच्या कारकीर्दीतली अनुक्रमे चौथी, नववी आणि बारावी शतके ठरली.