क्रिकेटच्या मैदानावरील रंजक घडामोडी…
१९०२
अॅडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने चौथ्या डावात सहा बाद ३१५ धावा करून इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. चौथ्या डावात ३००पेक्षा अधिक धावा करणारी तो कसोटी इतिहासातला पहिला संघ ठरला.
१९४८
भारताविरुद्ध द्विशतक झळकवणारे सर डॉन ब्रॅडमन पहिले ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरले. त्यांनी अॅडलेड कसोटीत २०१ धावा केल्या. तेच त्यांचे बारावे आणि अखेरचे द्विशतकही ठरले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे आणखी एक महान फलंदाज नील हार्वे यांनी कसोटी पदार्पण केले.
१९५२
दक्षिण आफ्रिकेचे पहिले गौरेतर कसोटी आणि वनडे क्रिकेटपटू ओमर हेन्री यांचा जन्म. १९९२ वर्ल्डकपमध्ये ते दक्षिण आफ्रिकेकडून खेळले. त्याच वर्षी डर्बनमध्ये त्यांनी भारताविरुद्ध चाळीसाव्या वर्षी कसोटी पदार्पण केले.
१९५८
पाकिस्तानचे महान फलंदाज हनीफ मोहंमद यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध तब्बल ९७० मिनिटे तळ ठोकून ३३७ धावा केल्या. त्यावेळी कसोटी इतिहासातील ती दुस-या क्रमांकाची वैयक्तिक खेळी होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक प्रदीर्घ खेळी म्हणूनही या खेळीचा बरीच वर्षे लौकीक होता. पुढे हिमाचल प्रदेशच्या राजीव नय्यरने १९९९-२०००च्या रणजी हंगामात ४५ मिनिटे अधिक खेळून हनीफ मोहंमद यांचा विक्रम मोडला.
१९६०
ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्रेग रिची याचा जन्म. ऑस्ट्रेलियाकडून तो १९८२ ते १९८७ या काळात ३० कसोटी सामने खेळला. ३५ची सरासरी फार आकर्षक नसली, तरी एक तडाखेबंद फलंदाज म्हणून तो प्रसिद्ध होता.
१९७५
मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवरील पहिला कसोटी सामना या दिवशी खेळवला गेला. कसोटी क्रिकेटमधील ते ४८वे मैदान ठरले. वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना भारताने २०१ धावांनी गमावला. वेस्ट इंडिजने ती मालिका ३-२ अशी जिंकली. विंडीज कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांची कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट २४२ नाबाद ही खेळी याच सामन्यातली. त्यांना बिशनसिंग बेदी यांनी शून्यावर जीवदान दिले होते.
१९९९
ऑस्ट्रेलियन पंच रॉस इमरसन यांनी अॅडलेडमधील एका वनडे सामन्यात श्रीलंकेचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनची गोलंदाजी ‘चेंडूफेकी’बद्दल नोबॉल ठरवली. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात इमरसन यांच्या कॉलनंतर संतप्त होऊन लंकेचा कर्णधार अर्जुना रणतुंगा याने आपला संघ पॅव्हेलियनमध्ये परत नेला. सामना अखेरीस सुरू झाला आणि इंग्लंडने प्रथम फलंदाजी करून तीनशेच्या पलीकडे मजल मारली. पण चिथावलेल्या गेलेल्या लंकेच्या फलंदाजांनी त्वेषाने फलंदाजी करून ते लक्ष्य गाठून दाखवले. ३०३ धावांच्या श्रीलंकेच्या डावात विजयी धावा मुरलीधरननेच फटकावल्या!
२००१
वेस्ट इंडिज क्रिकेट रसातळाला गेल्याचे दाखवून देणारा दिवस. ऑस्ट्रेलियातील तिरंगी स्पर्धेत सिडनीतील सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध वेस्ट इंडिजसमोर लक्ष्य होते अवघ्या १३९ धावांचे. पण तेही त्यांना गाठता आले नाही! आठ बाद ३१ अशी त्यांची एकवेळ अवस्था झाली होती. ९१ धावांमध्ये डाव आटोपला. ब्रायन लारासह पाच फलंदाजांना खातेही खोलता आले नाही!