क्रिकेटच्या मैदानावरील रंजक घडामोडी…
१८६५
क्रिकेटमध्ये आता भरपूर पैसा आलेला आहे. त्यामुळे एखादा क्रिकेटपटू त्याची कारकीर्द संपल्यानंतर भणंग दशेत मरू शकतो, ही कल्पनाच सध्या करवत नाही. पण अशी वेळ एका क्रिकेटपटूवर इंग्लंडमध्ये आली होती. त्या दुर्दैवी क्रिकेटपटूचे नाव आहे बिल ब्रॉकवेल, ज्याचा जन्म या दिवशी झाला. १८९३ ते १८९९ या काळात ते इंग्लंडकडून सात कसोटी सामने खेळले. पण निवृत्तीनंतर त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे साधनच राहिले नाही. आयुष्याची शेवटची १५ वर्षे ते बेघराचं आयुष्य जगले.
१८८८
एका भलत्याच नशीबवान क्रिकेटपटूचा जन्म. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर आणि कर्णधार हर्बी कॉलिन्स यांचा जन्म. ते घोड्यांच्या शर्यतींवर डॉलर लावायचे आणि जिंकायचे. नाणेफेकीच्या बाबतीतही ते असेच सुदैवी होते. १९२० ते १९२६ या काळात ते १९ कसोटी सामने खेळले. त्यांनी इंग्लंडविरुद्ध मालिकेत नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाला ४-१ असा विजयही मिळवून दिला होता.
१९११
माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक कमल विनायक भांडारकर यांचा जन्म. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी केल्यानंतर भांडारकर प्रशिक्षक झाले. सुनील गावस्कर यांच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता.
१९४८
एकाच कसोटी सामन्यात तब्बल १२ क्रिकेटपटूंचे पदार्पण. ही अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात ब्रिजटाऊन, बार्बेडोस येथील सामन्यात. पण या १२पैकी तीन क्रिकेटपटू लिजंड्स ठरले. ते होते. जिम लेकर (इंग्लंड) आणि एव्हर्टन वीक्स व क्लाइड वॉलकॉट (दोघे वेस्ट इंडिज).
१९५४
वेस्ट इंडिजचे महान फलंदाज जॉर्ज हेडली यांचा शेवटचा कसोटी सामना. या सामन्यात त्यांनी केवळ १६ आणि एक धावाच केल्या. पण वेस्ट इंडिजने तो सामना जिंकला.
१९६४
भारताचे महान फिरकी गोलंदाज भागवत चंद्रशेखर यांचे कसोटी पदार्पण. मुंबईतील त्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध चंद्रशेखर यांनी ६७ धावांत चार विकेट घेतल्या. पुढे १५ वर्षाच्या चमकदार कारकीर्दीत चंद्रशेखर यांनी २४२ विकेट घेतल्या.
१९७०
इंग्लंडचा लेगस्पिनर इयन सॅलिसबरी याचा जन्म. १५ कसोटी सामन्यांत २० बळी घेण्यासाठी त्याने कितीची सरासरी द्यावी.७६.९५! कौंटी क्रिकेट गाजवलेला सॅलिसबरी कसोटी क्रिकेटमध्ये मात्र सुमार ठरला.