जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात १९ जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घडामोडी…
१९१९
भारताच्या अंपायिरग क्षेत्रातील एक अध्वर्यू अहमद मोहंमद मामसा(१९१९-२००५) यांचा जन्म. त्यांनी १९६४ ते १९७३ या कालावधीत सहा कसोटी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले. याशिवाय ८० प्रथमश्रेणी सामन्यांमध्येही ते पंच म्हणून उभे राहिले होते. मुंबईत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नामवंत कसोटी पंच तयार झाले. त्यांच्या नावे अंपायर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट पंचगिरीबद्दल पुरस्कारही दिला जातो.
१९२२
ऑस्ट्रेलियाचे माजी महान फलंदाज आर्थर मॉरिस यांचा जन्म. त्यांनी १८व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतके ठोकली. अशी कामगिरी करणारे ते पहिले फलंदाज होते. १९४६-४७ या काळात त्यांनी इंग्लंडविरुद्ध त्यांच्या कारकीर्दीतील पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये तीन शतके झळकावली. त्या मालिकेत ऐतिहासिक हेडिंग्ले विजयातही त्यांचा वाटा होता. त्या सामन्यात विजयासाठीचे ४०४ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य केवळ तीन विकेटच्या मोबदल्यात गाठताना, मॉरिस यांनी १८२ धावा केल्या आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्याबरोबर ३०१ धावांची भागीदारीही रचली.
१९३०
दक्षिण आफ्रिकेचे यष्टिरक्षक जॉन वेट यांचा जन्म. दक्षिण आफ्रिकेच्या संघावर बहिष्कार टाकला जाण्यापूर्वी ५० कसोटी सामने खेळलेले ते एकमेव दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटू. चांगले यष्टिरक्षक आणि उपयुक्त फलंदाज म्हणून ते ओळखले जायचे. ३०पेक्षा अधिक फलंदाजी सरासरी देताना त्यांनी चार शतकेही झळकावली.
१९३३
वादग्रस्त ‘बॉडीलाइन’ कसोटीचा शेवटचा दिवस. हॅरॉल्ड लारवुड आणि बिल व्होस यांच्या दहशती मा-यासमोर ऑस्ट्रेलियाचा डाव १९३ धावांमध्येच आटोपला आणि इंग्लंडने ३३८ धावांनी मोठा विजय मिळवला.
१९७७
जॉन लिव्हर आणि डेरेक अंडरवुड यांच्या गोलंदाजीसमोर चेन्नई कसोटीत भारताचा दुसरा डाव अवघ्या ८३ धावांमध्ये संपला आणि इंग्लंडने २०० धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबर इंग्लंडने मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली. ४३ वर्षानी प्रथमच इंग्लंडने त्यावेळी भारतात मालिका जिंकली होती.
२००४
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि विख्यात समालोचक, प्रशिक्षक डेव्हिड हुक्स यांचा दुर्दैवी मृत्यू. मेलबर्नमधील एका रेस्तराँबाहेर झालेल्या बाचाबाचीतून हुक्स यांना मारहाण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हुक्स आक्रमक फलंदाज होते आणि एका सामन्यात त्यांनी इंग्लंडचे टोनी ग्रेग यांच्या एकाच षटकात सलग पाच चौकार लगावले होते.
२००८
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पर्थ कसोटीत ऐतिहासिक विजय. वेगवान गोलंदाजांचे नंदनवन मानल्या जाणा-या मैदानावर भारताचा तो पहिलाच विजय होता. त्या मालिकेत या कसोटीआधीच्या सिडनी कसोटीतील प्रकारांमुळे भारतीय संघाला मोठय़ा मानहानीला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे पर्थमधील विजय भारतासाठी फार महत्त्वाचा होता. इशांत शर्माच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगची उडालेली भंबेरी या सामन्याचे एक वैशिष्टय ठरली.