क्रिकेटच्या मैदानावरील रंजक घडामोडी
‘बॉडीलाइन’ कसोटीच्या शेवटून दुस-या दिवशी ऑस्ट्रेलियन बोर्डाची तातडीची बैठक होते. यात एमसीसी (इंग्लिश) बोर्डाला तार करण्याचा ठराव ८-५ असा मंजूर होतो. या तारेत बॉडीलाइन डावपेचाचा निषेध करण्यात आला होता. ‘बॉडीलाइन डावपेचामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजासमोर केवळ शरीररक्षण इतके एकच उद्दिष्ट राहते. हे डावपेच खिलाडूवृत्तीला धरून नाही. हा प्रकार त्वरित थांबवण्याविषयी आपल्या क्रिकेटपटूंना आदेश न दिल्यास, त्याचा गंभीर परिणाम ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोस्त देशांतील संबंधांवर होऊ शकतो.’ एमसीसीनेही तितक्याच कडक शब्दांत उत्तर दिले.. ‘आम्ही या तारेचा निषेध करतो. खिलाडू वृत्तीला बाधा आली असे आम्हाला वाटत नाही. तरीही तुम्हाला ही मालिका रद्द करायची असल्यास आमचीही तयारी आहे’!
१९६१
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुप्रसिद्ध ‘टाय’ मालिकेतील तिसरा सामना जिंकून वेस्ट इंडिजने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
१९७२
माजी कसोटीपटू, मुंबईकर विनोद कांबळीचा जन्म. सचिन तेंडुलकरबरोबर शारदाश्रमसाठी ६६४ धावांची विक्रमी भागीदारी केल्यानंतर तोही चर्चेत होता. डॅशिंग, शैलीदार फलंदाजी आणि बिनधास्त वृत्ती ही त्याची वैशिष्टये होती. पहिल्या चार कसोटींमध्ये दोन द्विशतके ठोकणा-या मोजक्या फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. त्याचबरोबर, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या १० डावांमध्ये सर्वाधिक ८८० धावा करण्याचा भारतीय विक्रमही त्याच्या नावावर आहे. अर्थात पुढे सातत्याच्या अभावामुळे त्याची कसोटी कारकीर्द अपेक्षित झळाळी घेऊ शकली नाही, हेही खरे.१७ कसोटीत चार शतकांसह १०८४ धावा तसेच १०४ वनडेत दोन शतकांसह २४७७ धावा कांबळीच्या नावावर आहेत.
१९७७
पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियन भूमीवरील पहिला विजय. इम्रान खान आणि सर्फराझ नवाझ या मध्यमगती गोलंदाजांनी १८ विकेट घेऊन सिडनीमधील या विजयात मोलाचे योगदान दिले.
१९९८
बांगलादेशमध्ये झालेल्या इंडिपेंडन्स कप वनडे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध सात बाद ३१६ धावा तडकावून सनसनाटी विजय मिळवला. त्या वेळचा तो वनडे इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला. पाकिस्तानने ३१४ धावा केल्या होत्या. भारतातर्फे सौरव गांगुलीने १२४ आणि रॉबिन सिंगने ८२ धावा करून अवघड लक्ष्य दृष्टिपथात आणले. मग दोन चेंडू शिल्लक असताना हृषिकेश कानिटकरने साकलेन मुश्ताकला मिडविकेटवरून चौकार ठोकला आणि एका संस्मरणीय विजयावर शिक्कामोर्तब झाले.
१९९९
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध सेंच्युरियन येथील पाचवी कसोटी ३५१ धावांनी जिंकून मालिका ५-० अशी जिंकली. एखाद्या संघाकडून वेस्ट इंडिजला मिळालेला कसोटी इतिहासातील तो पहिला व्हाइटवॉश ठरला.
२०००
सेंच्युरियनलाच झालेल्या आणखी एका सामन्यातील विजय इंग्लिश कर्णधार नासिर हुसेन आणि त्याच्या सहका-यांसाठी संस्मरणीय ठरला असता. पण नंतरच्या काही घटनांनी त्या विजयाचा रंग उडून गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए या निकालाच्या केंद्रस्थानी होता. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला सहा बाद १५५ धावाच करता आल्या. मग दुसरा, तिसरा आणि चौथा दिवस पावसाने वाया गेला. पाचव्या दिवशी क्रोनिएने आठ बाद २४८वर डाव घोषित केला. त्याने तत्पूर्वी हुसेनशी चर्चा केली होती. त्यानुसार इंग्लंडने पहिला डाव ० धावसंख्येवर घोषित केला! कारण त्या वेळच्या नियमानुसार कोणत्याही संघाला पहिला डाव बहाल (फोरफीट) करता येत नाही. क्रोनिएने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव मात्र शून्यावरच ‘फोरफीट’ केला. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी २४९ लक्ष्य होते. ते इंग्लंडने दोन विकेट्स राखून गाठले. क्रिकेटमधील रोचकता टिकवण्यासाठी दोन्ही कर्णधारांनी छान क्लृप्ती लढवली, अशी प्रतिक्रिया उमटली. प्रत्यक्षात आपण एका बुकीशी संधान साधून सामना निकाली ठरावा म्हणूनच हे घडवून आणले, अशी कबुली क्रोनिएने नंतर दिली.