जाणून घ्या क्रिकेटच्या इतिहासात १५ जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घडामोडी…
१८९५
ऑस्ट्रेलियाचे आल्बर्ट ट्रॉट यांचे इंग्लंडविरुद्ध संस्मरणीय कसोटी पदार्पण. अॅडलेडला झालेल्या या सामन्यात ट्रॉट यांनी ४३ धावांमध्ये आठ विकेट घेतल्याच, शिवाय दोन्ही डावांमध्ये दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन अनुक्रमे नाबाद ३८ आणि नाबाद ७२ धावाही केल्या. ऑस्ट्रेलियाकडून तीन कसोटी सामने खेळलेले ट्रॉट पुढे इंग्लंडकडूनही दोन कसोटी सामने खेळले.
१९३०
पदार्पणाच्या कसोटीच्या दुस-या डावात वेस्ट इंडिजचे विख्यात फलंदाज जॉर्ज हेडली यांनी शतक झळकावले. त्यांच्या शतकामुळेच वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्ध पराभव टाळता आला.
१९५९
इंग्लिश फलंदाज कॉलिन काउड्रे यांनी सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत कूर्मगतीने शतक पूर्ण केले. १०० धावा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ३६२ मिनिटे खर्ची घातली. अॅशेस मालिकेच्या इतिहासातील ते त्यावेळचे सर्वाधिक संथ शतक ठरले. पुढे हा ‘विक्रम’ इंग्लंडचेच बॉब वुल्मर यांनी मोडला. १९७५ मध्ये काउड्रे यांना मागे टाकताना वुल्मर यांनी शतक पूर्ण करण्यासाठी ३२ मिनिटे (३९४) अधिक घेतली!
१९८३
भारताविरुद्ध पाकिस्तानातील हैदराबादला झालेल्या कसोटी सामन्यात जावेद मियांदाद आणि मुदस्सर नझर यांनी तिस-या विकेटसाठी ४५१ धावांची विक्रमी भागीदारी केली. जावेद २८० धावांवर नाबाद राहिले, तर मुदस्सरनी २३१ धावा केल्या. कसोटी इतिहासात प्रथमच दोन पाकिस्तानी फलंदाजांनी एका डावात द्विशतके झळकावली होती. तिस-या विकेटसाठी त्यावेळी ती सर्वाधिक भागीदारी होती.
१९८५
पुन्हा एकदा भारताविरुद्ध एकाच डावात दोन प्रतिस्पर्धी फलंदाजांची द्विशतके! चेन्नई कसोटीत ग्रॅमी फाउलर आणि माइक गॅटिंग यांनी अनुक्रमे २०१ आणि २०७ धावा फटकावल्या. त्या वेळेपर्यंतच्या ६१० कसोटी सामन्यांत प्रथमच दोन इंग्लिश फलंदाजांनी एकाच डावात द्विशतके झळकावली होती.
१९८८
लेगस्पिनर नरेंद्र हिरवाणीचे स्वप्नवत कसोटी पदार्पण.. चेन्नई कसोटीत याच दिवशी हिरवाणीच्या ऐतिहासिक गोलंदाजीमुळे भारताला बलाढय़ वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवता आली. हिरवाणीने पहिल्या डावात ६१ धावांमध्ये आठ विकेट घेतल्या होत्या. यात साक्षात व्हिव्हियन रिचर्ड्सला त्रिफळाचीत करण्याचा पराक्रमही त्याने केला होता. पण दुस-या डावात या दिवशी त्याने ७५ धावांमध्येच पुन्हा एकदा आठ विकेट घेतल्या आणि चौथ्या दिवशीच सामना संपवला. पदार्पणात १६ बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बॉब मेसीनेही इंग्लंडविरुद्ध १९७२ मध्ये केला, पण त्याच्यापेक्षा एक धाव कमी दिल्यामुळे हिरवाणीने नवा विक्रम नोंदवला. कसोटी इतिहासात केवळ दोनदाच हिरवाणीपेक्षा एखाद्या गोलंदाजाने अधिक चांगली कामगिरी करून दाखवली. इंग्लंडच्या जिम लेकरने १९५६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९० धावांत १९ बळी घेतले. त्याच्या काही वर्षे आधी इंग्लंडच्याच सिडनी बार्न्सने ऑस्ट्रेलियाविरुद्धच १५९ धावांत १७ बळी घेतले होते. ‘हिरवाणी स्पेशल’ सामन्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे दुस-या डावात यष्टिरक्षक किरण मोरेने पाच फलंदाजांना आणि संपूर्ण सामन्यात सहा फलंदाजांना यष्टिचीत केले. जो आजही एक विक्रम आहे.
२००२
श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने झिम्बाब्वेच्या हेन्री ओलोंगाला गॉल कसोटी त्रिफळाचीत करून ४००वा बळी मिळवला.
२०१२
पर्थ कसोटीत डावाने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील आघाडी ३-० अशी वाढवली. पाहुण्यांच्या (१६१ आणि १७१) खराब फलंदाजीमुळे तीन दिवसांतच सामना निकाली ठरला.