मुंबईतील मुलुंड, विक्रोळी, मालाड, पवई, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर या भागात तुरळक प्रमाणात रिक्षा होत्या. मात्र, पश्चिम उपनगरात मालाड, कांदिवली, बोरिवली, सांताक्रुझ, जोगेश्वरी या परिसरात रिक्षासेवा ठप्प होती.
मुंबई – अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालावा, ओला, उबेर, टॅक्सी फॉर शुअर यांसारख्या खासगी टॅक्सी कंपन्यांवर बंदी घालावी, चालक-मालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करणे, या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी रिक्षा-टॅक्सी संघटनांनी पुकारलेल्या एकदिवसीय संपाला समिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, तरीही उपनगरात अनेक ठिकाणी रिक्षांअभावी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, मागण्या मान्य न केल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
[poll id=”1293″]
मुंबईतील मुलुंड, विक्रोळी, मालाड, पवई, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर या भागात तुरळक प्रमाणात रिक्षा होत्या. मात्र, पश्चिम उपनगरात मालाड, कांदिवली, बोरिवली, सांताक्रुझ, जोगेश्वरी या परिसरात रिक्षासेवा ठप्प होती. त्यामुळे आठवडय़ाच्या सुरुवातीलाच नोकरदार वर्गासह, मुलांना शाळेत नेणारे पालक आदी मुंबईकरांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी कसरत करावी लागली. रिक्षा संपाचा फायदा घेत काही ठिकाणी अतिरिक्त भाडे आकारून प्रवाशांचा खिसा रिकामी करण्याचे प्रकारही घडले.
अखेर परिवहन आयुक्त आणि रिक्षा संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात दुपारी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास संप अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. दरम्यान, रिक्षा संपामुळे बेस्ट प्रशासनाने उपनगरात विशेष बस चालवल्या. आगार व्यवस्थापकांना जादा
चालवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरता बेस्टने ८९ जादा बस चालवल्या. तर ९८ मार्गावर इतर बसमार्गाच्या गाडय़ा वळविण्यात आल्या होत्या.
जबरदस्तीचा बंद
रविवारी मध्यरात्रीपासूनच रिक्षा वाहतूक उपनगरात बंद करण्यात येत होती. काही ठिकाणी रिक्षाचालक संपात सामील झाले होते. तर काही ठिकाणी रिक्षा चालकांना संप कशासाठी पुकारण्यात आला आहे याचीही कल्पना नव्हती. रिक्षा बंद न करणा-या रिक्षाचालकाला दमदाटी करण्यात येत होती. शिवाय, काही रिक्षाचालक राजकीय पक्षांचे झेंडे रिक्षाला लावून प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दृश्य होते.
अवैध वाहतूक आणि विविध मागण्यांसाठी परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त कार्यालय यांना अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली. मात्र, यावर सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने संप पुकारावा लागला.
– शशांक राव, अध्यक्ष, ऑटोरिक्षा मेन्स युनियन