रिक्षा-टॅक्सीचे भाडेसूत्र ठरवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या हकीम समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई –रिक्षा-टॅक्सीचे भाडेसूत्र ठरवण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या हकीम समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे रिक्षा-टॅक्सी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. 1 सप्टेंबपर्यंत भाडेवाढीच्या निर्णयाबाबत वाट बघू, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष ए. एल. क्वॉड्रोस यांनी सांगितले.
वाढत्या महागाईचा विचार करून रिक्षा-टॅक्सीच्या भाडय़ात वाढ मिळावी, अशी मागणी संघटनांनी केली होती. त्यानुसार भाडेसूत्र ठरवण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी हकीम समितीची नियुक्ती करण्यात आली. समितीने 27 जुलै रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला. मात्र त्यानंतर महिना होत आला तरी या अहवालावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे भाडेवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या टॅक्सी-रिक्षा संघटना संतप्त झाल्या आहेत. सरकारने भाडेवाढीचा निर्णय तातडीने घ्यावा, यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून निवेदनही सादर केले जाईल.