काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतल्यामुळे, राहुल यांचा लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल या चर्चेने जोर धरला आहे.
नवी दिल्ली – काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतल्यामुळे, राहुल यांचा लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल या चर्चेने जोर धरला आहे. डॉ. सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल आणि विस्ताराची चर्चा सुरू असतानाच या भेटींमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्काना उधाण आले आहे.
पंतप्रधान आणि राहुल यांच्या भेटीचा तपशील उपलब्ध झाला नसला तरी राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांना मंत्रिमंडळात आणखी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या ज्योतिरादित्य शिंदे, मिलिंद देवरा, सचिन पायलट, जतीन प्रसाद हे तरुण नेते मंत्रिमंडळात असून, संभाव्य विस्तारासाठी माणिका टागोर आणि मीनाक्षी नटराजन यांची नावे चर्चेत आहेत. तर ज्योतिरादित्य यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याची शक्यता आहे.
तृणमूल काँग्रेस सरकार आणि यूपीएमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या वाटेचे एक कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्र्यांच्या जागा रिक्त आहेत. तसेच द्रमुकचे ए. राजा आणि दयानिधी मारन यांच्या राजीनाम्यांमुळे दोन कॅबिनेटमंत्र्यांच्या जागा रिक्त आहेत. यातील बहुतेक सर्व जागा काँग्रेसकडेच जातील असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. तसेच सध्या ज्या मंत्र्यांकडे दोन खात्यांचा कारभार आहे, त्यांच्याकडे एकाच खात्याचे मंत्रिपद ठेवले जाणार आहे. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र या चार महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये बदल होणार नाहीत.
मात्र पंतप्रधान काँग्रेसच्या ज्या मंत्र्यांच्या कारभारावर खुश नाहीत त्यांना पक्षबांधणीच्या कामासाठी परत पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराची तारीख जाहीर झाली नसली तरी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी २० तारखेला दुर्गापूजेसाठी त्यांच्या मूळगावी जाणार आहेत. त्यामुळे शुक्रवारीच हा विस्तार होऊ शकतो. राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी सूचना खुद्द पंतप्रधानांनी वेळोवेळी केली आहे.
१९ जुलै २०१२ला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना, आपण मोठी जबाबदारी घेण्यास तयार आहोत, मात्र याचा निर्णय पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष घेतील, असे म्हटले होते. त्यानंतर राहुल मंत्रिमंडळात सहभागी होणार की पक्षातच मोठी जबाबदारी स्वीकारणार याबद्दल चर्चाना उधाण आले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये पंतप्रधानांनी ‘मंत्रिमंडळात सहभागी होण्याचे आपले आमंत्रण राहुल गांभीर्याने घेतील’, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. खुद्द राहुल यांनी मात्र आतापर्यंत काँग्रेस संघटनेच्या विस्तारासाठी आणि मजबुतीसाठी काम करण्यास प्राधान्य दिले आहे.