राहुल गांधी यांना केंद्र सरकारमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी आपण त्यांना वेळोवेळी आमंत्रित केले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ आहे
नवी दिल्ली – ‘‘राहुल गांधी यांना केंद्र सरकारमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी आपण त्यांना वेळोवेळी आमंत्रित केले आहे. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ आहे. ते आपल्या विनंतीचा गांभीर्याने विचार करून लवकरच एखादे महत्त्वाचे पद सांभाळताना दिसतील,’’ असा आशावाद पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी ‘नाम’ परिषदेवरून मायदेशी परतताना व्यक्त केला. ‘‘राहुल गांधी यांनी सक्रिय राजकारणात येऊन सरकारमध्ये महत्त्वाचे पद सांभाळावे, ही आपली फार जुनी इच्छा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या सहभागासाठी मी अनेकदा त्यांना विनंतीदेखील केली. ते या वेळी माझ्या विनंतीचा नक्कीच विचार करतील,’’ असे पंतप्रधान म्हणाले.
कोळसा खाणवाटप गैरव्यवहारप्ररकरणी विरोधी पक्षांकडून केली जाणारी राजीनाम्याची मागणीही पंतप्रधानांनी फेटाळून लावली. ‘‘आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. भाजपने याचे भान ठेवून जनतेच्या कौलाचा सन्मान करायला हवा,’’ असे ते म्हणाले. पाकिस्तान दौ-याबाबत दिलेल्या निमंत्रणाबाबत पंतप्रधान म्हणाले, पाकिस्तानच्या निमंत्रणाचा मला आनंद आहे. पाकिस्तानला जाण्यास उत्सुक आहोत. मात्र पाकिस्तान दौ-यासाठी ही योग्य वेळ नाही.
सप, डाव्यांचे संसदेसमोर धरणे
कोळसा खाणवाटप गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी आणि वितरित करण्यात आलेले परवाने रद्द करावे, अशी मागणी करत समाजवादी पक्षाने डावे पक्ष आणि तेलुगू देशम याच्या साथीने संसदेसमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, भाजपच्या खासदारांनी शुक्रवारीही संसदेत गोंधळ घातल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.