केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून भेटीगाठींचे सत्र सूरू असून गुरुवारी राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.
नवी दिल्ली– केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने राजधानी दिल्लीत दोन दिवसांपासून भेटीगाठींचे सत्र सूरू आहे. गुरुवारी काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी बुधवारीच पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची भेट घेतली होती. यामुळे राहुल गांधी यांचा समावेश मंत्रिमंडळात होईल या चर्चाने जोर धरला आहे.
मंगळवारी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी दोन दिवस घेतलेल्या भेटीचे परिणाम या महिन्याअखेर होणा-या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये दिसणार आहेत.
राहुल गांधी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यात तब्बल ३० मिनीटे चर्चा झाली. या भेटीमधील तपशील अद्याप देण्यात आला नाही. मात्र ही एक नेहमीची भेट असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राहुल गांधींनी सरकारमध्ये सहभागी व्हावे यासंदर्भातील चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. गेल्या चार दिवसातील राजकीय भेटीगाठीवरुन राहुल गांधीही सरकारमधील मोठी जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. मात्र ही जबाबदारी नेमकी कोणती असेल याबाबत चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २० ते २३ ऑक्टोबर दरम्यान दुर्गा पुजेसाठी पश्चिम बंगालला जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रपती पुन्हा राजधानीत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन देशाच्या सुरक्षीततेच्या संदर्भातील माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता.
[EPSB]
राहुल ब्रिगेडवर मोठी जबाबदारी?
काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतल्यामुळे, राहुल यांचा लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल या चर्चेने जोर धरला आहे.
[/EPSB]