नवी दिल्ली – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेला परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आणि संघ महिलांविरोधी असल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘भाजपने देशाला ४ महिला मुख्यमंत्री, ४ महिला राज्यपाल, ६ केंद्रीय मंत्री दिल्या आहेत,’ असे स्वराज यांनी म्हटले. अहमदाबादमध्ये महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
भाजप आणि संघात महिलांना समान वागणूक मिळत नसल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. ‘संघाच्या शाखेत एखाद्या महिलेला शॉर्ट्स घालून जाताना तुम्ही कधी पाहिले आहे का?,’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना विचारला होता. याबद्दल सुषमा स्वराज यांना अहमदाबादमधील कार्यक्रमात एका तरुणीने त्यांची प्रतिक्रिया विचारली. ‘राहुल गांधींचे विधान मला पटले नाही. त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरायला नको होती. याबद्दल तुम्हाला काय वाटते?’, असा प्रश्न एका तरुणीने स्वराज यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘तुम्हाला जे वाटले, तेच मलाही वाटले. एका राष्ट्रीय पक्षाच्या उपाध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींनी त्या पद्धतीची भाषा वापरायला नको होती. ते आता पक्षाचे अध्यक्ष होणार, अशीही चर्चा आहे. मात्र त्यांनी वापरलेली भाषा अयोग्य आहे. त्यांनी पातळी न सोडता टीका केली असती, तर मी त्यांना जरूर उत्तर दिले असते,’ असे स्वराज म्हणाल्या.
संघ आणि भाजपमध्ये महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले जात असल्याची टीकादेखील राहुल गांधींनी केली होती. यालाही स्वराज यांनी प्रत्युत्तर दिले. आमच्या सरकारआधी कधीही एखादी महिला सीसीएसची (कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी) सदस्य झाली नव्हती. भाजप सरकारच्या काळात या कमिटीतील ५ पैकी दोन सदस्य या महिला आहेत,’ अशा शब्दांमध्ये स्वराज यांनी राहुल यांच्या टीकेला उत्तर दिले. सीसीएसच्या कमिटीमध्ये पंतप्रधानांसह गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री यांचा समावेश असतो. राहुल गांधींनी मंगळवारी संघ आणि भाजपवर टीकेची झोड उठवली होती. भाजप आणि संघ महिलांविरोधी असल्याचा घणाघात त्यांनी केला होता.
‘जोपर्यंत महिला काहीच बोलत नाहीत, शांत आहेत, तोपर्यंत भाजपसाठी सर्व व्यवस्थित असते. मात्र महिलेने स्वत:चे मत व्यक्त केल्यावर तिला शांत केले जाते. संघ भाजपची मुख्य संघटना आहे. यामध्ये किती महिला आहेत? तुम्ही कधी महिलांना संघात शॉर्ट्स घालून जाताना पाहिले आहे का? मी तर पाहिलेले नाही,’ असे राहुल गांधींनी म्हटले होते.