राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा वाढून देणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा वाढून देणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. मागील जागावाटपाच्या सूत्राप्रमाणेच या वेळी ही जागा वाटप होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने क्रांतीस्तंभाला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांबरोबर बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने १४४ जागांची मागणी केली होती. ती मागणी यापूर्वीच काँग्रेसने फेटाळली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त यश मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत. २००९ च्या निवडणुकीतही त्या वेळच्या लोकसभा निवडणुकीतील यशाचा आधार घेत जागा वाटप करण्यात आले होते. त्या धर्तीवर आताही जागावाटप व्हावे असे राष्ट्रवादीला वाटते. त्यातूनच त्यांनी निम्म्या जागांची मागणी केली होती. मात्र काँग्रेसने ती मागणी फेटाळत राष्ट्रवादीला अधिकच्या जागा सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यात आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र जागा वाटपा बाबत चर्चा झाली नाही.
शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात झालेल्या बैठकीतही १४४ जागांची मागणी राष्ट्रवादीने कायम ठेवली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जास्त जागा सोडणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करतानाच जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा केंद्रीय पातळीवरच होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
माणिकराव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला अधिकच्या जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट होत आहे. वेळ आली तर काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचेही यापूर्वी ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान जागा वाटपा बाबतची चर्चा ही प्रसारमाध्यमातून नको अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली.