संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणावर विरोधकांनी निराशा व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या अभिभाषणावर विरोधकांनी निराशा व्यक्त केली आहे. जेएनयू, देशद्रोहाच्या कायद्याचा गैरवापर आणि जाट आरक्षणाला लागलेल्या हिंसक आंदोलनाबाबत केंद्र सरकारने बाळगलेले मौन यावर विरोधकांनी टीका केली.
केंद्र सरकारच्या योजना व धोरणाचे प्रतिबिंब अभिभाषणात उमटत असते. मात्र, देशातील महत्त्वाच्या मुद्दय़ांचा उल्लेख नसल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, संसदेत आपण राष्ट्रपतींचे भाषण ऐकले. त्यांनी सरकारच्या विविध कामगिरीचा आढावा घेतला, पण रोहितचा मृत्यू व विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या वादांबद्दल काहीच वक्तव्य केले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले.
कॉँग्रेसचे खासदार अश्वनी कुमार म्हणाले की, संसदेत राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणजे सरकारच्या धोरणांचे प्रतिनिधित्व करते. मात्र, हे भाषण निराशजनक होते. देशाला भेडसावणा-या समस्यांवर तोडगा काढण्याबाबतची कोणतीही दखल या भाषणात नव्हती. सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले की, देशद्रोहाच्या कायद्यातील तरतुदींचा गैरवापर करणे, सीमाबाबतचे मुद्दे, रोहित वेमुला प्रकरण, महागाई, जाट आंदोलन आदी महत्त्वाच्या विषयांचा अभिभाषणात मुद्दाच नव्हता, असे ते म्हणाले.