राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्यावरुन जनता दल युनायटेडने पलटी मारली आहे.
नवी दिल्ली – राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडण्यावरुन जनता दल युनायटेडने पलटी मारली आहे. रालोआमधून बाहेर पडण्यासंबंधी आम्ही भाजपला कोणताही इशारा दिलेला नाही असे जेडीयूचे अध्यक्ष आणि रालोआचे संयोजक शरद यादव यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.
रालोआ अजूनही एकत्र आहे. फक्त रालोआ राष्ट्रीय कार्यक्रमापासून भरकटली आहे. रालोआला ठरलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमानुसार काम करावे लागेल असे शरद यादव म्हणाले.
पुढील लोकसभा निवडणूकीसाठी भाजपच्या प्रचारप्रमुखपदी नरेंद्र मोदी यांच्या निवडीचा निर्णय न पटल्याने कालच जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दोन दिवसाच्या आत पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवा असा निर्वाणीचा इशारा दिला होता. पण जेडीयूने आता यावरुन घुमजाव केले आहे.
काही गोष्टी या रालोआच्या राष्ट्रीय अजेंडयाच्या विरोधात जाणा-या आहेत असे यादव म्हणाले. मोदींचा निवड हा भाजपचा अंतर्गत विषय आहे. पण या निवडीनंतर गोव्यात भाजपच्या काही नेत्यांनी जी वक्तव्ये केली ती आमच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या विरोधात जाणारी होती त्यावर आमचा आक्षेप आहे असे यादव यांनी सांगितले.