मागील वर्षी घटलेले पर्जन्यमान आणि पाण्याचा वाढता उपसा यामुळे रायगड जिल्ह्यात भूजलपातळी कमालीची खालावली आहे.
अलिबाग- मागील वर्षी घटलेले पर्जन्यमान आणि पाण्याचा वाढता उपसा यामुळे रायगड जिल्ह्यात भूजलपातळी कमालीची खालावली आहे. सर्वाधिक फटका उत्तर रायगडाला बसला असून कर्जत, खालापूर, पेण, सुधागड या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. रायगड जिल्ह्यात सरासरी ३१४२ मिलीमीटर पाऊस पडतो.
मात्र मागील वर्षी २१०४ मिलीमीटरच पाऊस पडला. सुमारे ४० टक्के कमी पाऊस पडल्याने पुरेसा पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या रायगड जिल्ह्यातील २८ धरणांमध्ये अवघा ३० टक्के पाणीसाठा आहे. भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावली असून पावसाला आणखी महिनाभर बाकी असताना येत्या काळात रायगडात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या ६५ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, पाली, तळा आणि म्हसळा तालुक्यातील भूजलपातळी मागील पाच वर्षाच्या तुलनेत खालावली आहे. श्रीवर्धन, रोहा, महाड तालुक्यात भूजलपातळीत अंशत: घट झाली आहे. उरण, मुरुड या तालुक्यात भूजलपातळीत फारशी घट झालेली नाही.
पाण्याचा अतिप्रमाणात आणि अनिर्बंध उपसा हे भूजलपातळी घटण्याचे प्रमुख कारण ठरत असून रायगड जिल्ह्यातील मोठया प्रमाणातील औद्योगिकीकरण व नागरिकरणही याला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे पाणी जमिनीत जिरवण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.