एकेकाळी भाताचे कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यात भातशेतीचे शिवार पुन्हा फुलणार आहे.
अलिबाग – एकेकाळी भाताचे कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यात भातशेतीचे शिवार पुन्हा फुलणार आहे. जिल्ह्यात औद्योगिकीकरण व इतर कारणांमुळे भात लागवडीचे क्षेत्र कमी होत असल्याने भाताचे उत्पादन घटले होते. मात्र स्थानिक शेतक-यांनी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन देणारी सुधारित बियाणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी क्षेत्रात भाताची उत्पादकता वाढवली आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन वाढणार असून यंदा ३३ लाख क्विंटल भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. परंतु मागील काही वर्षात जिल्हा औधोगिक जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. समुद्राचे खारेपाणी शेतजमिनीत घुसून जमीन मोठया प्रमाणावर नापीक होत आहेत. काही भागात अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली आहे. त्यामुळे भातशेतीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाताचे उत्पादन कमी कमी होईल, अशी भीती व्यक्त होत होती.
जिल्ह्याच्या कृषि विभागाने शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देण्याचे काम सुरूच ठेवले आहे. त्यामुळे भाताचे उत्पादन वाढते आहे. खरिप हंगामात साधारण १ लाख २५ हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र होते ते आता १ लाख १३ हजार हेक्टरवर आले आहे. यंदा कृषी विभागाने ग्रामीण भागात शेतीशाळा घेतल्या. त्या माध्यमातून जनजागृती केली. त्याचबरोबर जिल्ह्यात ठिकठिकाणी ४६ प्रयोग राबवले त्यातून शेतकऱ्यांना सुधारीत तंत्रज्ञान आणि बियाण्यांच्या वापराची माहिती मिळाली. शिवाय कृषी विभागाने केवळ माहिती न देता प्रात्यक्षिकांवर भर दिला.
कृषी विभागाने यंदा कापणीच्या हंगामात जिल्ह्यातील १३२ गावांत ३२४ ठिकाणी भातकापणी प्रयोग राबवले. त्यासाठी कृषि विभाग, महसूल विभाग व जिल्हा परिषद या तीन यंत्रणा कार्यरत आहेत. भातकापणीच्या प्रयोगासाठी कुठली गावे आणि कुठले क्षेत्र निवडायचे हे शास्त्रोक्त पद्धतीने सांख्यिकी प्रशिक्षण कार्यक्रमातच निश्चित करण्यात आले.
यंदा भातकापणी प्रयोगाचे जे अहवाल प्राप्त होत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात भाताची उत्पादकता गतवर्षीच्या तुलनेत वाढली आहे. मागील वर्षी भाताची उत्पादकता प्रतिहेक्टरी २८ क्विंटल होती. ती आता ३० क्विंटल प्रतिहेक्टरी होईल, असा अंदाज आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात अंदाजे ३० लाख क्विंटल इतके भाताचे उत्पादन झाले. त्यापैकी १९ लाख क्विंटल भाताची विक्री शेतक-यांनी केली. यंदा जिल्ह्यात भाताचे उत्पादन ३३ लाख क्विंटलपर्यंत पोहोचेल, असा कृषि विभागाचा अंदाज आहे.