राम मंदिराला जे पूर्वी विरोध करीत होते ते आता रामभक्त झाल्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.
लखनौ- ‘अयोध्येत राम मंदिर उभारण्यापासून जगातील कोणतीच ताकद आम्हाला रोखू शकत नाही. बाबरी मशिद आणि राम मंदिर या मुद्दय़ावरील चर्चेला आता पूर्णविराम मिळाला पाहिजे. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समाजाचादेखील पाठिंबा मिळत आहे,’ असे भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.
बाबरी मशिद पाडल्याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वरील विधान केले. राम मंदिराला जे पूर्वी विरोध करीत होते ते आता रामभक्त झाल्याचेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, आणि मुरली मनोहर जोशी यांना बाबरी मशिद प्रकरणी मंगळवारी लखनौ येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषनच्या विशेष न्यायालयाने वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. केंद्रीय मंत्री उमा भारती, विनय कटियार, विश्व हिंदू परिषदेचे नेते विष्णू हरी दालमिया आणि एकेकाळच्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्या साध्वी ऋतंभरा यांनादेखील यावेळी जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बाबर हा परकीय होता. त्याला हिंदुस्थानशी काही देणे-घेणे नव्हते. सातत्याने करण्यात येणारा ‘बाबरी’ असा उल्लेख प्रसारमाध्यमांनी टाळावा. ती रामजन्मभूमी आहे. – साक्षी महाराज, भाजप खासदार
मी या प्रकरणात (बाबरी मशिद) भक्तीभावाने सामाील झाले होते, त्यामुळे मी स्वत:ला गुन्हेगार समजन नाही. – उमा भारती, केंद्रीय मंत्री