कांदिवलीतील एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीची कांदिवली पोलिसांनी सोमवारी जबानी नोंदवून घेतली आहे.
मुंबई- कांदिवलीतील एका विवाहित महिलेच्या तक्रारीवरून तिच्या पतीची कांदिवली पोलिसांनी सोमवारी जबानी नोंदवून घेतली आहे. या प्रकरणात इतर पाच जणांची लवकरच जबानी नोंदवण्यात येणार आहे. या जबानीत स्वयंघोषित आध्यात्मिक धर्मगुरू राधे माँ यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग उघड झाल्यास त्यांचीही जबानी नोंदवली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
राधे माँ यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषदेत आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असून आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत, सांगून सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. आपल्यावरील आरोपांत काहीही तथ्य नसून मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. आपल्याला खोटया आरोपात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. विजय हा नेहमीच सत्याचा होतो व देव माझ्यासोबत आहे, असेही राधे माँ म्हणाल्या.
ही पत्रकार परिषद सुरू असताना समतानगर पोलीस ठाण्यात रमेश जोशी यांनी राधे माँ यांच्याविरुद्ध आणखी एक आरोप केला आहे. मार्चमध्ये कच्छमध्ये एकाच कुटुंबीयांच्या सात जणांच्या आत्महत्येमागे राधे माँ असल्याचे त्या म्हणाल्या. या तक्रारीची एक प्रत पोलीस आयुक्तांना देण्यात आली असून त्याची चौकशी करण्याची विनंती रमेश जोशी यांनी केली.
आपण निर्दोष असल्याचे सांगून काही जण जाणूनबुजून आपल्याला खोटया गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला. कांदिवलीत परिसरातील निक्की गुप्ता या महिलेने तिच्या सासरच्या सहा जणांसह राधे माँ यांच्याविरुद्ध हुंडयासाठी शोषण केल्याची तक्रार केली होती.
बोरिवलीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तिच्या या याचिकेची गंभीर दखल घेत कांदिवली पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तक्रादार महिलेचा पती नकुल दौलतकुमार गुप्ता, सासू लता गुप्ता, सासरे दौलतकुमार गुप्ता, दीर संदीप गुप्ता, जगमोहन गुप्ता आणि भावजय ज्योती गुप्ता यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यात आला होता. याच गुन्ह्यांत सोमवारी नकुल गुप्ता यांची पोलिसांनी चौकशी करून त्याची जबानी नोंदवून घेतली.