सर्वच विरोधकांना एकाच वेळी भक्कमपणे भिडणारा एकच भिडू राजकारणाच्या सारीपाटावर आहे आणि तो म्हणजे नारायण राणे! संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक केवळ तुमच्यामध्येच आहे. या विरोधकांकडे पाठ करा अन् आपले मार्गक्रमण सुरूच ठेवा. तुमच्या मागे मोठ्ठा जनसमुदाय आहे, हा आत्मविश्वास राणे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेहमीच दिला आहे. नारायण राणे नावाचा आजवरचा वादळी प्रवास पाहता, उद्याचा दिवस निर्णायक असेल यात शंका नाही.
महाराष्ट्रातील घडामोडींवर एक नजर टाकली असता संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री नारायण राणे या एकाच नावाभोवती संपूर्ण राजकारण केंद्रित झाले आहे. राणे काँग्रेस कधी सोडणार? ते आमदारकीचा राजीनामा देणार का? ते भाजपमध्ये जाणार की वेगळा पक्ष स्थापन करणार? काँग्रेसमुक्त झाल्यानंतर ते काय करणार? महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देणार का? एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश कधी होणार? राणे विधान परिषदेची निवडणूक लढविणार का? अशा अनेकविध प्रश्नांनी गेले काही महिने राणे हेच राज्यातील संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत. आतापर्यंतच्या वाटचालीत राणेंनी वेळोवेळी आपली दिशा स्पष्ट केली असली तरी त्यांच्याविषयी अधिकच चर्चा होत असते. यातच राणे यांचे कर्तृत्व, कामाचा आवाका आणि उरक, धडाडी, आक्रमकपणा, दरारा, नेतृत्वगुण प्रकर्षाने दिसून येतात.
काँग्रेस सोडताना नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर आहे. काँग्रेसमुक्त झाल्यानंतर आजपर्यंत सुरू असलेल्या घडामोडींवर नजर टाकली असता, राणेंचा राज्याच्या राजकारणातील दरारा, महत्त्व आणि प्रभाव दिसून येतो, तो त्यांना होणा-या सर्वपक्षीय विरोधामुळेच. राणेंनी २००५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदरभाव असूनही त्यांच्याप्रती निष्ठा कायम ठेवत, एका विशिष्ट क्षणी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते मंत्री झालेही. मात्र, अनेकदा अशोक चव्हाण आणि इतर अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या कंपूने स्वाभिमानी राणेंना अपमानास्पद वागणूक अन् उपरेपणाची जाणीव करून देत त्यांना पक्षात एकटे पाडण्याचाच प्रयत्न केला. अशा प्रकारची सापत्न भावाची वागणूक सातत्याने १२ वर्षे सहन केल्यानंतर पुन्हा एकदा राणे यांनी आपला लढवय्या बाणा दाखवून देत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. खरे तर नुकत्याच मिळालेल्या आमदारकीचा कालावधी संपायच्या आतच स्वत:हून आमदारकीचा त्याग करणे हे खाऊचे काम नाही. ज्यांनी सत्ता आणि त्याची नशा अनुभवली आहे, त्यांना हे चांगलेच माहीत आहे. असे असताना राणेंनी काँग्रेसचा आणि आमदारकीचा त्याग करून स्वत:च्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर अनेक विश्लेषकांनी आपली लेखणी चालवत हा निर्णय योग्य की अयोग्य याचा ऊहापोह सुरू ठेवला आहे, तर दुसरीकडे राणेंनी स्वतंत्रपणे राज्याच्या राजकारणात प्रवेश केल्याने भल्याभल्यांना आपले डोलारे कोसळताना दिसू लागले आहेत. त्यामुळे राणे यांना विरोध करण्यासाठी प्रत्येकजण एकमेकांना आधार देत उसने अवसान आणून बळ दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.
काँग्रेसचे खास दिल्लीतून आयात केलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर परवा ‘राणे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असतील तर आम्ही सर्व विरोधक एकत्र येऊ’ असे जाहीर केले, तर शिवसेनेच्या शिलेदारांनी ‘आम्ही सत्तेतून बाहेर पडू’ अशी नेहमीचीच पोकळ धमकी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेतानाच काँग्रेससोबत जाण्याचे मान्य केले. या तीनही पक्षांना राणेंविरोधात एकटय़ाने लढण्याची हिंमत आणि जिंकण्याची शाश्वती नसल्यानेच तिघे मिळून लढू असे म्हणण्याची आणि अभद्र युती करण्याची बुद्धी त्यांना झाली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना जेव्हा महाराष्ट्र आणि कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी मोठय़ा आत्मविश्वासाने सांगितले होते की, आम्हाला देशभरात काँग्रेसची एक हाती सत्ता आणि एकच पक्ष अशी परिस्थिती निर्माण करायची आहे. मात्र याच पृथ्वीराज चव्हाणांच्या आधिपत्याखाली असणा-या काँग्रेसची महाराष्ट्रातच नाही तर देशभरात काय अवस्था झाली, ते सर्वानी पाहिले आहेच. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या निकटवर्तीय नेत्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुसह्य व्हावी आणि मिळालेच तर अप्रत्यक्ष काही लाभ पदरात पाडून घ्यावेत याकरिता भाजपला सुरुवातीला सत्ता स्थापनेदरम्यान अदृश्य हातांनी मदतच केली, हेही वास्तव जनतेला अवगत आहे. तर दुतोंडी शिवसेनेने सत्तेत सहभागी झाल्याच्या क्षणापासून सत्तेत राहायचे, पण प्रत्येक निर्णय प्रक्रियेत खोडा घालायचा, सरकारच्या धोरणांवर आणि भाजपच्या नेत्यांवर बोचरी टीका करण्याचे उद्योग सुरूच ठेवले आहेत. सत्तेत भागीदार असूनही ते सत्ताधा-यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला विरोध करतात, प्रसंगी आंदोलने करतात. मग सामान्य जनतेला प्रश्न पडतो की, जेव्हा निर्णय होतात तेव्हा तुम्ही सत्तेचा भाग असताच ना? मग निर्णय होईपर्यंत आपला स्वार्थ साधायचा आणि पुन्हा नीचपणा, लबाडी करत ‘मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली..’ असे दाखवताना सत्ताधा-यांचे निर्णय, धोरण कसे चुकीचे होते याचा डांगोरा पिटायचा.. हे कसले राजकारण? केवळ संपत्ती वाढवण्याकरिता सुरू असणा-या अशा राजकारणाची अपेक्षा बाळासाहेबांना तर निश्चितच अभिप्रेत नव्हती.
ज्या राणेंच्या विरोधात अवघे विरोधक मूठ आवळत आहेत, एकत्रित येत असल्याची हाकाटी पिटत आहेत. त्यांच्यात खरोखरच एकी आहे? आणि जर अशी एकी असेल तर येणा-या विधानसभा, लोकसभा निवडणुकाही हे सर्व एकत्रित लढणार आहेत का? पण एक नक्की आहे, तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढी राणेंची ताकद आणि महत्त्व वाढणार आहे. राज्यातील जनतेला आणि खासकरून कोकणी माणसाला राणेंनी केलेल्या कामाची किंमत आहे. म्हणूनच आजही कोकणासह महाराष्ट्रातल्या चारही दिशेकडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा वाढतो आहे. राणेंना नामोहरम करण्याच्या नादात अनेक संघटनांनी सोशल मीडियाला हाताशी धरत खिल्ली उडवण्याचेही प्रयोग सुरू केले. त्यातून त्यांनी आपली संस्कृती दाखवून दिली. पण, ‘बार्किंग डॉग्ज सेल्डम बाईट’ हे जसे राणे जाणतात तसेच ‘हाथी चले अपनी चाल’ याचे महत्त्व आणि प्रभाव राणे पिता-पुत्र जाणून आहेत.
मुळात राणेंना विरोध का, हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसचे ‘आदर्श’फेम अशोक चव्हाण आणि कंपूला राणे चुकीचेच आहेत किंवा त्यांचा राजकारणात फारसा प्रभाव नाही, आपण त्यांना पुन्हा मुख्यमंत्री केले नाही, तो निर्णयच कसा योग्य होता अशी चापलुसी करत पुन्हा एकदा राज्याचा कारभार श्रेष्ठींकडून आपल्याच ताब्यात ठेवायचा आहे. दुस-या चव्हाणांना दिल्लीतील नातेसंबंधावर मुख्यमंत्रीपदावर पाठवून आपली खूप मोठी चूक झाली, हे एव्हाना मॅडमनी लक्षात घेतले असेलच. त्यात राज्यात एकटय़ा सिंधूदुर्ग वगळता कोणताही जिल्हा औषधापुरताही काँग्रेसकडे शिल्लक राहिलेला नाही, अशावेळी कोणत्या तोंडाने पुढच्या पंचवार्षिकमध्ये मुख्यमंत्रीपदाचा दावा करायचा या विंवचनेत असतानाच ‘राणेंना विरोध’ हा मुद्दा युवराजांच्या जवळ जाणारा दिसला. तसे या चव्हाणांनी आपली सोशल मिडीयावरची राजकीय जुळवाजुळव आतापासूनच जोमात सुरू केली आहे. काय करणार, मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांना दिल्ली सोडून क-हाड मुक्कामी किती दिवस राहायचे असा प्रश्न पडलाय, पण उत्तर मिळत नाही. कदाचित राणेंना विरोध केला तरच याचे उत्तर मिळू शकेल अशी भाबडी आशा त्यांना वाटते म्हणून तेही विरोधाच्या लाईनीत उभे आहेत.
शिवसेनेच्या विरोधाचे कारण अगदी स्पष्ट आहे. मनसे काय किंवा सेना काय सध्याचे ‘मुंबई बचाव’ आणि परप्रांतीयांना विरोध हे फक्त स्वत:ची तुंबडी भरण्याकरताच सुरु आहे. मनसेचे साधे नगरसेवक आपल्याकडे वळवताना कोटय़वधींची उधळपट्टी करणा-या सेनेची पालिकेतल्या प्रत्येक कामाच्या टेंडर टक्केवारीची जाहीर वाच्यता व्हायला फारसा उशीर लागणार नाही. हा धोका लक्षात घेत पुन्हा पुन्हा स्वत:ला वाघ समजणा-या या दोन बंधूंची शेपूट मांजरासारखी त्यांच्याच पायात अडकते आहे. या दोघांनाच नव्हे तर सर्वच विरोधकांना एकाच वेळी भक्कमपणे भिडणारा एकच भिडू राजकारणाच्या सारीपाटावर आहे आणि तो म्हणजे नारायण राणे! राणे पुन्हा मंत्री झाले तर आपल्या मुंबईवरील सत्तेला आव्हान मिळू शकते, टक्केवारी बंद होऊ शकते अशी भीती असल्यानेच शिवसेनेची तंतरली आहे. राणेंनी विधान परिषद लढवू नये, वा भाजपाने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. तीन वर्षाच्या कालावधीत सेनेने केलेली टीका, विरोध स्वीकारत भाजपाने सामोपचाराने तीन वर्षाचा संसार केलाच आहे. ‘आय लव्ह यू’ कुणी आधी म्हणायचं याकरता भांडणारे आता ‘तुझं माझं ब्रेकअप’ असं आधी कोण जाहीर करतंय याची वाट बघत आहेत. सेनेच्या कारनाम्याला मुख्यमंत्रीही वैतागलेले आहेत. राज्यातल्या भाजपच्या सल्लागारांनी पुढच्या कोणत्याही निवडणुकांमध्ये काहीही झाले तरी सेनेसोबत युती नको रे बाबा असे निक्षून सांगितल्यानेच मुख्यमंत्र्यांना उर्वरीत दोन वर्षाच्या सत्तेची नाही, तर पुढची आणखी पाच वर्षे एक हाती सत्तेची गणिते जुळवायची आहेत. त्यामुळे अत्यंत संयमाने ते या राजकीय पेचातून मार्गक्रमण करीत आहेत. या तीन वर्षात सत्तेचा अनुभव पहिल्यांदाच घेणा-या मुख्यमंत्र्यांनी अनेकांची विमाने जमिनीवर लॅण्ड केली आहेत. मग ते स्वकीय असोत वा विरोधक असोत. ज्येष्ठ असोत वा कनिष्ठ. सर्वानाच आपापल्या तलवारी म्यान कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे सन्मानाने स्वाभिमानी नारायण राणेंना मंत्रीपद देण्याची भूमिका त्यांच्याभोवतीच केंद्रीत होते आहे. कोणी विचारवंताने म्हटले आहे की, जेव्हा अवघे जग तुमच्या विरोधात असते, तेव्हा त्यांच्याकडे पाठ करा अन् आपल्या मार्गाने संयमाने, आत्मविश्वासाने पुढेच चालत रहा.. तुमच्यामागे तुमचेच विरोधक तुमचे पाठिराखे बनून मार्गक्रमण करत असतात. त्यातही तीन भाग असतातच.. हौसे, नवसे आणि गवसे! यातल्या प्रत्येकाला तुम्ही कुठंपर्यंत पोहोचताय आणि तुम्ही नेमकी काय दिशा घेताय हे पाहायचे असते. तुमच्या मागे येण्यामुळे ते आपले काम आणि ध्येय बाजूला ठेवतात आणि त्यांच्याही नकळत ते तुमचीच दिशा पकडतात. म्हणूनच कदाचित ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हणतात. राजकारणात ज्याला विरोधक अधिक तोच खरा यशस्वी नेता असे मानले जाते ते उगाच नाही. नारायण राणे नावाचा आजवरचा वादळी प्रवास पाहता, उद्याचा दिवस निर्णायक असेल यात शंका नाही.