राज्य सरकारने एसटी महामंडळाला आर्थिक तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली.
मुंबई – राज्य सरकारने एसटी महामंडळाला आर्थिक तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. या मागणीसाठी ते गुरुवार, २६ डिसेंबर रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. तसेच बेकायदा वाहतुकीवर कारवाई केली जावी, अशी मागणीही जगताप यांनी केली.
राज्य परिवहन महामंडळ सध्या आर्थिक संकटात आहे. अशा वेळी राज्य सरकारने महामंडळास मदत करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने राज्याच्या अर्थसंकल्पात नव्या बस खरेदी करण्यासाठी दर वर्षी २ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी जगताप यांची मागणी आहे. उसाला दर मिळावे, यासाठी नुकतेच आंदोलन झाले. या आंदोलनाचा फायदा खासगी बेकायदा आणि चोरटी वाहतूक करणा-यांनी घेतला.
त्यातूनच एसटीच्या अनेक गाडय़ांची तोडफोड झाली. ही तोडफोड करणा-यांवर कारवाई केली जावी, अशी मागणीही जगताप यांनी केली आहे. यासाठी आझाद मैदानात भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे राज्यस्तरीय पदाधिकारी धरणे आंदोलन करणार आहेत.
विविध सवलतींपोटी राज्य सरकारकडून महामंडळाला जवळपास १,५०० कोटी रुपये मिळणे शिल्लक आहेत. तसेच डोंगराळ आणि दुर्गम भागातल्या वाहतुकीमुळे एसटीला ३०० कोटी रुपयांचा तोटा दरवर्षी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी महामंडळाला मदत करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.